Breaking
Updated: मार्च 9, 2026
हॉटेलचीही केली तोडफोड; चौघांवर गुन्हा
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई: अंबाजोगाईत वाढत्या गुंडगिरीचा नंगानाच पाहायला मिळाला आहे. स्त्यावर गाडीला बाजू देण्याच्या क्षुल्लक कारणावरून शहरातील नामांकित हॉटेल व्यावसायिक अविनाश परशुरामजी मेहता यांच्यावर लोखंडी रॉड आणि काठीने प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि.०८) सायंकाळी मोंढा भागातील मुख्य रस्त्यावर घडली. विशेष म्हणजे मारहाण केल्यानंतर हल्लेखोर टोळक्याने मेहता यांच्या हॉटेल मेवाड बिस्ट्रो येथे जाऊन तोडफोड केली. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिसांनी राहुल भारत इदगले याच्यासह त्याच्या साथीदारांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी अविनाश मेहता यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवारी सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास ते आपल्या मोटारसायकलवरून घरून हॉटेलकडे जात होते. ते मोंढ्यातील मुख्य रस्त्यावर असताना पाठीमागून आलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारने त्यांना जोरात ५ ते ७ वेळा हॉर्न दिला. मेहता यांनी बाजूला गाडी थांबवली असता, कारमधील राहुल भारत इदगले आणि एका पवार आडनावाच्या व्यक्तीने त्यांना खाली उतरून अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. “रस्ता असताना कार का आडवी लावली?” असे विचारले असता, आरोपींनी मेहता यांना लोखंडी रॉड आणि काठीने डोक्यावर, हातावर, पाठीवर आणि पायावर बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. यावेळी मध्यस्थी करणाऱ्या प्रतिक गुत्तेदार या तरुणालाही त्यांनी धक्काबुक्की केली. ही मारहाण सुरू असतानाच पोलिसांनी येण्याची चाहूल लागताच आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. गंभीर जखमी झालेल्या मेहता यांना अनिकेत देशपांडे आणि अफ्रोज पठाण यांनी उपचारासाठी एका एका खासगी रुग्णालयात दाखल केले.

मारहाणीनंतर आरोपींनी मेहता यांचे हॉटेल असलेल्या मेवाड बिस्ट्रोवर धाव घेतली. तेथे राहुल इदगले, पवार आणि इतर दोन अनोळखी व्यक्तींनी लोखंडी रॉडने खुर्च्या आणि काउंटरची तोडफोड करून सुमारे २० हजार रुपयांचे नुकसान केले. “जर पोलीस ठाण्यात तक्रार केली तर जिवे मारून टाकू,” अशी धमकी देऊन आरोपींनी परिसरात दहशत निर्माण केली आणि मेहता यांचा मोबाईल घेऊन पसार झाले. या प्रकरणी मेहता यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र लक्ष्मणराव घुगे करत आहेत. अत्यंत वर्दळीच्या भागात टोळक्याने खुलेआम हिंसक धुडगुस घातल्यामुळे शहरातील व्यापाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
