गेवराई : तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांच्या कामांची तपासणी करण्यासाठी विशेष पथके नेमण्यात आली आहेत. जलजीवन मिशनअंतर्गत मंजूर झालेल्या मात्र अपूर्ण असलेल्या योजनांची कामे येत्या दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

उन्हाळ्यात तालुक्यातील अनेक गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो. पुढील उन्हाळ्यापूर्वी तालुका टँकरमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी विहीर पुनर्भरण, जलस्रोत बळकटीकरण आणि साठवण टाक्यांच्या दुरुस्तीवर भर देण्यात येत आहे.

ग्रामपंचायतींची जबाबदारी

योजना पूर्ण झाल्यानंतर त्यांची देखभाल-दुरुस्ती आणि पाणीपट्टी वसुलीची जबाबदारी ग्रामपंचायतींकडे राहणार आहे. यासाठी ग्राम पाणीपुरवठा समित्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. पाण्याची गुणवत्ता तपासणीसाठी प्रत्येक गावात किट उपलब्ध करून दिले जाणार आहेत.