Breaking
Updated: मे 26, 2026
लग्नाला अवघे १२ दिवस; अंबाजोगाईत नवविवाहित तलाठ्याची गळफास घेऊन आत्महत्या
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई: नजीकच्या मोरेवाडी परिसरात सोमवारी दुपारी एका नवविवाहित तरुणाने भाड्याच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गणेश दत्तू कोळी (वय अंदाजे वर्षे, मूळ रा. नांदुर्गा, ता. औसा) असे मृत व्यक्तीचे नाव असून ते चंद्रपूर महसूल विभागात तलाठी पदावर कार्यरत होते. अवघ्या १२ दिवसांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. पत्नी कर्तव्यावर गेलेली असताना त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.
मृत गणेश कोळी यांचा विवाह १३ मे २०२६ रोजी बीड येथील दिपाली यांच्याशी झाला होता. दिपाली या अंबाजोगाई येथील अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील फॉरेन्सिक विभागात कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत. लग्नानंतर त्यांनी मोरेवाडी येथील एका घरात भाड्याने खोली घेतली होती. सोमवारी दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास, पत्नी ड्युटीवर गेलेली असताना गणेश यांनी खोलीतील लोखंडी हुकाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. या प्रकरणी अंबाजोगाई पोलीस ठाण्यात अद्याप गुन्हा नोंद झाला नसून, मंगळवारी शवविच्छेदनानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.