Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

गेवराईत कामाच्या कारणावरून वाद; दोन भावांवर कोयत्याने प्राणघातक हल्ला

Updated: जानेवारी 15, 2026

By Vivek Sindhu

दोन भावांवर कोयत्याने प्राणघातक हल्ला

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

गेवराई: गेवराई शहरातील माढा कॉलनी परिसरात कामाच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर हिंसक घटनेत झाले असून, दोन भावांवर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी महेश सुभाष पवार या २६ वर्षीय मजुराने गेवराई पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना १४ जानेवारी २०२६ रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास घडली.

फिर्यादी महेश पवार हे आपला भाऊ मेघराज याच्यासह माढा कॉलनी येथे असताना त्यांनी एका कामगाराला गवंडी कामाऐवजी आपल्यासोबत वीज जोडणीच्या (लाईट फिटिंग) कामाला येण्यास सांगितले. याच वेळी तिथे असलेल्या हरिओम क्षिरसागर याने मध्यस्थी करून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढल्याने हरिओमने आपल्या घरातून कोयता आणला आणि महेशच्या डाव्या हाताच्या मनगटावर वार करून त्याला जखमी केले. यावेळी हरिओमच्या आईनेही मुलाला चिथावणी देत हल्ला करण्यास प्रवृत्त केले, ज्यानंतर हरिओमने मेघराज पवार याच्या हाताच्या कोपरावरही कोयत्याने वार केला.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून गेवराई पोलिसांनी हरिओम क्षिरसागर आणि त्याच्या आईविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ३(५) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गणेश घोलप या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


Categories

Recent Posts