Breaking

किरकोळ रागातून धारूरमध्ये तरुणाच्या डोळ्यात घातला दगड

Updated: एप्रिल 10, 2026

By Vivek Sindhu

किरकोळ रागातून धारूरमध्ये तरुणाच्या डोळ्यात घातला दगड

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

धारूर: मुलाला कशासाठी विचारताय, काय काम आहे? असा साधा प्रश्न विचारल्याच्या रागातून दोन जणांनी एका ४० वर्षीय व्यक्तीच्या डाव्या डोळ्यावर दगड मारून त्यांना गंभीर जखमी केल्याची भयंकर घटना धारूर तालुक्यातील मुन्नानाईक तांडा येथे घडली आहे. आठ एप्रिल रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही हाणामारी झाली.

याप्रकरणी स्वतः सुनिल बाबुराव राठोड (वय ४०, रा. मुन्नानाईक तांडा, उमरेवाडी, ता. धारूर) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, आठ एप्रिलच्या रात्री ते आपल्या घरी असताना गावातीलच नितेश सुभाष पवार आणि सुभाष चापसिंग पवार (दोघे रा. उमरेवाडी, ता. धारूर) हे त्यांच्या दारात आले. त्यांनी सुनिल यांचा मुलगा सुशिल कुठे आहे, अशी विचारणा केली. त्यावर सुनिल यांनी त्यांना काम सांगितल्याशिवाय मी तुम्हाला तो कुठे आहे ते सांगणार नाही, असे स्पष्ट केले.

केवळ इतकेच बोलल्याचा राग आल्याने आरोपी नितेश आणि सुभाष यांनी सुनिल यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. संतापाच्या भरात आरोपी नितेश याने जमिनीवर पडलेला एक दगड उचलून सुनिल यांच्या डाव्या डोळ्यावर भिरकावला. यात त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर सुभाष याने सुनिल यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हे भांडण सोडवण्यासाठी सुनिल यांची पत्नी मध्ये आली असता, आरोपींनी तिलाही ढकलून दिले, ज्यात तिला मुका मार लागला. जाताना दोन्ही आरोपींनी सुनिल आणि त्यांच्या मुलाला जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी सुनिल राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धारूर पोलीस ठाण्यात नितेश पवार आणि सुभाष पवार या दोघांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार मस्के हे करत आहेत.


Categories

Recent Posts