Breaking
Updated: जानेवारी 7, 2026
आत्महत्या; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई: शेताच्या वादातून आणि शेजाऱ्यांकडून होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून मुडेगाव येथील एका ४५ वर्षीय शेतकऱ्याने आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शिवशंकर दशरथ जगताप असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा आशिष याने दिलेल्या फिर्यादीवरून बर्दापूर पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवशंकर जगताप यांची मुडेगाव शिवारात गट नंबर २०४ आणि २०७ मध्ये शेती आहे. शेताच्या बांधावरील बाभळीचे खोड फवारल्याच्या कारणावरून शेजारील शेतकरी त्यांना वारंवार शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत होते. या त्रासामुळे शिवशंकर जगताप प्रचंड तणावाखाली होते. ६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७ ते ७:४५ वाजण्याच्या सुमारास त्यांनी शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये लोखंडी आडूसाला दोरीने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली.
आत्महत्येपूर्वी शिवशंकर जगताप यांनी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. यामध्ये त्यांनी दत्तात्रय बबरुवान उपाडे, आल्लका दत्तात्रय उपाडे, बालाजी दत्तात्रय उपाडे, माऊली दत्तात्रय उपाडे, आनुसया बबरु उपाडे, शाम प्रकाश जगताप आणि वेंकट हानुमंत जगताप या सात जणांच्या त्रासामुळे आपण जीवन संपवत असल्याचे नमूद केले आहे. या सर्वांविरुद्ध कलम १०८ आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. बर्दापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रमेश घुले या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.