Breaking
Updated: मे 5, 2026
घाटनांदूरमध्ये कुलरमध्ये पाणी भरताना विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई: तालुक्यातील घाटनांदूर येथे मंगळवारी सकाळी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर कुलरमध्ये पाणी भरत असताना विजेचा तीव्र धक्का लागून नजीर खदीर सय्यद या २६ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना सकाळी साडेआठच्या सुमारास घडली असून यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा कर्ता पुरुष अचानक गेल्याने सय्यद कुटुंबाचा आधार कायमचा हिरावला गेला आहे.
नजीर हा नेहमीप्रमाणे सकाळी कामावर जाण्याच्या तयारीत असताना घरातील लोखंडी कुलरमध्ये पाणी टाकत होता. यावेळी अचानक कुलरमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने त्याला विजेचा जोरदार धक्का बसला आणि तो कोसळला. पत्नी आणि वडिलांनी तातडीने वीजपुरवठा बंद करून त्याला उपचारासाठी स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. दुर्दैवाने तिथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
नजीरच्या पश्चात पत्नी, अवघ्या आठ महिन्यांची मुलगी आणि वृद्ध आई-वडील असा परिवार आहे. घरातील एकमेव कमवता आधार गेल्याने या कुटुंबावर उपजीविकेचे मोठे संकट उभे राहिले आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून विद्युत उपकरणे वापरताना नागरिकांनी विशेषतः कुलरमध्ये पाणी भरताना वीजपुरवठा बंद ठेवण्याची काळजी घ्यावी असे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.