Breaking
Updated: डिसेंबर 20, 2025
वनविभागाने पिंजरा लावण्याची मागणी
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई /प्रतिनिधी : पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यांनंतर आता बीड जिल्ह्यातही बिबट्याचा थरार पाहायला मिळत आहे. अंबाजोगाई तालुक्यातील दगडवाडी आणि डोंगर पिंपळा शिवारात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचे समोर आल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
शेतीची कामे ठप्प, पशुपालक चिंतेत
दगडवाडी आणि डोंगर पिंपळा हा भाग डोंगराळ असल्याने येथे बिबट्याला लपण्यासाठी सुरक्षित जागा मिळत आहे. काही शेतकऱ्यांना प्रत्यक्ष बिबट्याचे दर्शन झाले असून, शेतात वन्य प्राण्यांच्या पावलांचे ठसेही आढळून आले आहेत. यामुळे शेतात खुरपणी, कापणी किंवा पाणी भरण्यासाठी जाण्यास शेतकरी घाबरत आहेत. विशेषतः पहाटे आणि संध्याकाळच्या वेळी शेतात जाणे आता जिवावर बेतणारे ठरू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.
पाळीव प्राण्यांवर हल्ल्याची भीती
शेतकऱ्यांच्या गोठ्यातील गायी, म्हशी आणि शेळ्यांवर बिबट्या हल्ला करण्याची शक्यता असल्याने पशुपालक रात्रभर जागून आपल्या जनावरांचे रक्षण करत आहेत. यापूर्वी राज्याच्या इतर भागात बिबट्याने मानवी वस्त्यांमध्ये शिरून हल्ले केल्याच्या घटना ताज्या असल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे सावट आहे.
वन विभागाकडे पिंजऱ्याची मागणी
परिसरातील शेतकऱ्यांनी आणि ग्रामपंचायतीने वन विभागाकडे या घटनेची माहिती दिली आहे. “प्रशासनाने केवळ पाहणी न करता तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अन्यथा एखादी मोठी दुर्घटना घडू शकते,” असा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे.