Breaking
Updated: ऑक्टोबर 30, 2025
अंबाजोगाईतून कर्जाच्या वादातून अल्पवयीन मुलाचे अपहरण
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई : चतुरवाडी शिवारातील एका विटभट्टीवर मजुरी करणाऱ्या मजुराच्या अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अरविंद गायकवाड (रा. सिरसाळा, ह.मु. तपोवन) व त्याचे चार अनोळखी साथीदारांविरुद्ध अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी राजखान चाँदखान पठाण (रा. हरंगुळ, ता. गंगाखेड, ह.मु. चतुरवाडी शिवार, अंबाजोगाई) यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले की, त्यांनी आरोपी अरविंद गायकवाड याच्याकडून आठ महिन्यांपूर्वी २५ हजार रुपये हातउसने घेतले होते. त्यातील २० हजार रुपये परत केले असून केवळ ५ हजार रुपये देणे बाकी आहे.
दि. २८ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३० वाजता फिर्यादींचा मुलगा शाहेद (वय १७) याने फोन करून सांगितले की, अरविंद गायकवाड व त्याचे चार साथीदार विटभट्टीवर दोन मोटारसायकलींवर आले असून त्याला शिवीगाळ करून “तुझ्या वडिलांनी ७० हजार रुपये दिल्यावरच तुला सोडतो” अशी धमकी देत जबरदस्तीने घेऊन जात आहेत.
फिर्यादींनी आरोपीशी फोनवर चर्चा केली असता आरोपीने २५ हजारांच्या कर्जाची रक्कम व्याजासह ७० हजार झाल्याचे सांगून ती तातडीने देण्याची मागणी केली. त्यानंतर आरोपींनी शाहेद पठाण याला जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून अपहरण केले. नंतर शाहेदने वडिलांना कळविले की, आरोपींनी त्याला परळी बसस्थानकावर आणून पोलिसांचे फोन आल्याने सोडून दिले आहे.
या घटनेवरून अरविंद गायकवाड व त्याचे चार साथीदार यांच्याविरुद्ध अपहरण, धमकी व जबरदस्ती केल्याचा गुन्हा अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.