Breaking
Updated: सप्टेंबर 6, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई : परळी विधानसभा मतदारसंघातील सुगाव गावातील मराठा सेवक नितीन माणिकराव चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या करून जीवन संपवले. मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे सुरू केलेल्या आमरण उपोषणाच्या पार्श्वभूमीवर नितीन चव्हाण यांनी आरक्षण न मिळाल्यामुळे हा टोकाचा निर्णय घेतला होता. त्यांच्या पश्चात वृद्ध आई व दोन अल्पवयीन मुली अशी जबाबदारी उरली असून कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.
या कठीण प्रसंगी ॲड. माधव जाधव यांनी सुगाव येथे जाऊन चव्हाण कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी पीडित कुटुंबाला धीर देत दोन लहान मुली अनुष्का चव्हाण (वय 9) व वेदिका चव्हाण (वय 12) यांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. तसेच तत्काळ मदत म्हणून वीस हजार रुपयांचा धनादेश देऊन आधार दिला.
कुटुंबाला दिलासा देताना ॲड. माधव जाधव यांनी सांगितले की, “नितीन चव्हाण यांनी समाजासाठी बलिदान दिले. त्यांच्या दोन मुली व आईवर संकट आले आहे. या कुटुंबाला मी शक्य ती मदत करणार असून मुलींच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी माझी असेल.”
या वेळी नांदगावचे उपसरपंच अमोल चव्हाण, अमरदिप मोरे, संतोष गोपीनाथ चव्हाण, राजेभाऊ महादेव शिंदे, नंदकिशोर देविदास चव्हाण, कुलदीप व्यंकटराव अडसूळ, विश्वजीत सुंदरराव शिंदे यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामुळे सुगाव गावातील नागरिकांनी ॲड. माधव जाधव यांचे आभार मानले असून यामुळे समाजात सकारात्मक संदेश गेल्याची भावना व्यक्त केली आहे.