Breaking
Updated: नोव्हेंबर 21, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई : अंबाजोगाई शहर विकासाबाबत नंदकिशोर मुंदडा यांनी मांडलेल्या व्हिजनचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर शिवसंग्राम पक्षाने अंबाजोगाई शहर परिवर्तन जनविकास आघाडीला अधिकृत पाठिंबा जाहीर केला. शिवसंग्रामच्या राष्ट्रीय अध्यक्षा ज्योतीताई मेटे यांनी शहरात येऊन नंदकिशोर मुंदडा यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली आणि विकासाधिष्ठित भूमिकेच्या आधारे हा निर्णय जाहीर केला. या पाठींब्यामुळे जनविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांचा आत्मविश्वास अधिक वाढला आहे.
शिवसंग्रामचे संस्थापक स्व. विनायकराव मेटे यांना मानणारा मोठा वर्ग अंबाजोगाई शहरात आहे. यामुळे शहरात पक्षाचा प्रभाव लक्षणीय आहे. शिवसंग्रामच्या वतीने धनेश सोपानराव गोरे यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र उमेदवारी मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी राष्ट्रीय अध्यक्षा ज्योतीताई मेटे स्वतः अंबाजोगाईत दाखल झाल्या. त्यांनी नंदकिशोर मुंदडा यांच्याशी शहर विकास, सुरु असलेल्या प्रकल्पांचा वेग, तसेच आगामी योजनांवर सविस्तर चर्चा केली. या भेटीत मुंदडा यांनी मागील काही वर्षांत शहरात झालेल्या शेकडो कोटींच्या विकासकामांची माहिती ज्योतीताई मेटे यांच्या समोर मांडली. शहरत झालेळे सिमेंट कॉंक्रीटचे मजबूत रस्ते, प्रगतीपथावर असलेली पाणीपुरवठा योजना, ड्रेनेज तसेच पुढील काही वर्षांसाठी आखलेल्या विकास आराखड्याची माहिती पाहून ज्योतीताई मेटे प्रभावित झाल्या. नंदकिशोर मुंदडा यांचे विकासाधिष्ठित नेतृत्व आणि पुढील दृष्टीकोन पाहून ज्योतीताई मेटे यांनी धनेश गोरे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचे जाहीर करीत जनविकास आघाडीला जाहीर समर्थन देण्याची घोषणा केली.
ज्योतीताई मेटे यांनी सांगितले की, शिवसंग्रामचे सर्व कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा आणि आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्यासाठी एकदिलाने मेहनत करतील. शहर हितासाठी स्थिर, प्रामाणिक आणि विकासाभिमुख नेतृत्वाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. या प्रसंगी बोलताना नंदकिशोर मुंदडा यांनी ज्योतीताई मेटे यांचा आणि शिवसंग्राम पक्षाचा आभार व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, दिलेल्या पाठिंब्याची जाण ठेवून शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन अंबाजोगाई शहराला विकासाच्या अधिक मजबूत मार्गावर नेण्याचे काम सुरू राहील. शिवसंग्रामच्या या पाठिंब्यामुळे नंदकिशोर मुंदडा यांच्यासह जनविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या मताधिक्यात वाढ होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. शिवसंग्रामच्या पाठींब्यामुळे जनविकास आघाडीचे पारडे अधिक जड झाल्याचे स्पष्ट होत आहे.