Breaking
Updated: जानेवारी 7, 2026
खा.बजरंग सोनवणेंनी चेन्नईतील बैठकीत मांडले महत्वपुर्ण मुद्दे
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelखा.बजरंग सोनवणेंनी चेन्नईतील बैठकीत मांडले महत्वपुर्ण मुद्दे
केज: केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण विषयक संसदीय स्थायी समिती (२०२५-२६) अंतर्गत अन्नधान्य वाहतूक : रेल्वेमार्गाद्वारे हालचाल अधिक कार्यक्षम करण्याबाबत’ आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस खा.बजरंग सोनवणे यांनी चेन्नई येथे उपस्थिती लावली. बैठकीत रेल्वेमार्गे अन्नधान्य वाहतूक अधिक कार्यक्षम करावी, असे महत्वाचे विविध मुद्दे मांडले.
या बैठकीत भारतीय अन्न महामंडळ (एफसीआय), रेल्वे विभाग तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सखोल व सविस्तर चर्चा झाली. देशभरात अन्नधान्याची वेळेत व सुरक्षित वाहतूक कशी सुनिश्चित करता येईल, वाहतूक खर्चात कशी बचत करता येईल, तसेच रेल्वे नेटवर्कचा अधिक प्रभावी आणि नियोजनबद्ध वापर कसा करता येईल, याबाबत विविध मुद्द्यांवर सविस्तर विचारमंथन करण्यात आले.
अन्नधान्याच्या साठवण, वाहतूक व वितरण प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी, विलंब व खर्च यावर उपाययोजना सुचविताना रेल्वेमार्गे वाहतूक अधिक बळकट करण्यावर भर देण्यात आला. विशेषत: सार्वजनिक वितरण प्रणाली अधिक सक्षम करण्यासाठी रेल्वे आणि एफसीआय यांच्यातील समन्वय वाढविणे, आधुनिक लॉजिस्टिक व्यवस्थेचा वापर, तसेच तंत्रज्ञानाधारित उपाययोजना राबविण्याबाबत चर्चा झाली. अन्नसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा व उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. शेतकरी, ग्राहक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी अन्नधान्य पुरवठा साखळी अधिक मजबूत, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. यावेळी बोलताना खा.बजरंग सोनवणे यांनी सांगितले, अन्नधान्याची वेळेत व सुरक्षित वाहतूक ही देशाच्या अन्नसुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची असून, रेल्वेमार्गाचा प्रभावी वापर झाल्यास खर्चात बचत होऊन सार्वजनिक वितरण प्रणाली अधिक सक्षम होईल. या दृष्टीने संसदीय स्थायी समितीच्या माध्यमातून ठोस निर्णय व शिफारसी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.