Breaking

धारूर घाटात कार ३०० फूट दरीत कोसळली, दोघे सख्खे भाऊ गंभीर जखमी

Updated: June 22, 2025

By Vivek Sindhu

Screenshot 20250622 172114 Chrome

WhatsApp Group

Join Now

किल्लेधारूर : धारूर घाटातील अरुंद रस्ता आणि निकामी संरक्षण भिंतीमुळे अपघातांची मालिका थांबायचे नाव घेत नाहीये. रविवारी (दि. २२ जून) सकाळी सुमारास धारूरहून माजलगावकडे जाणारी कार घाटातील एका वळणावरून थेट ३०० फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात कारमधील दोघे सख्खे भाऊ गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातग्रस्त कार ही हुंडाई कंपनीची असून तिचा क्रमांक एमएच २२ डब्ल्यू २३६३ असा आहे. कार चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने आणि रस्त्यालगत असलेली संरक्षण भिंत निष्क्रिय झाल्याने ही कार खोल दरीत कोसळली. अपघातात भीमराव पायाळ (वय ५८) आणि संदीप पायाळ (वय ५६) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी दोघांनाही धारूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात केले. जखमींना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी बीड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

धारूर घाटातील रस्ता अरुंद असून संरक्षणासाठी उभारण्यात आलेल्या भिंती अनेक ठिकाणी निकामी झाल्या आहेत. यामुळे अपघातांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. या भागातील प्रवासी आणि स्थानिक नागरिक अनेक वर्षांपासून घाट दुरुस्तीची मागणी करत आहेत.

दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दोन दिवसांपूर्वी या घाट रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर केला असून, लवकरच काम सुरू होण्याची अपेक्षा आहे. धारूर घाटात अपघातांचे सत्र थांबविण्यासाठी तातडीने घाटाच्या रस्त्याची सुधारणा करणे अत्यावश्यक झाले आहे.