Breaking
Updated: डिसेंबर 31, 2025
भिमा कोरेगाव येथे येणाऱ्या वाहनांना टोलमाफी द्या
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelखा.बजरंग सोनवणे यांचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे महाव्यवस्थापकांना पत्र
केज: दि.१ जानेवारी २०२६ रोजी पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक भीमा कोरेगाव विजयस्तंभ येथे होणाऱ्या मानवंदना कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो अनुयायी व नागरिक दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्या दिवशी राज्यातील सर्व टोल नाक्यांवरून जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी देण्यात यावी, अशी मागणी खा.बजरंग सोनवणे यांनी केली आहे.
याबाबत खा.बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य महाव्यवस्थापक व प्रादेशिक अधिकारी, तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) व्यवस्थापकीय संचालक यांना लेखी निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे, भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी बीडसह राज्यातील विविध जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने नागरिक प्रवास करणार आहेत. या प्रवासासाठी हजारो वाहने रस्त्यावर उतरल्याने टोल नाक्यांवर मोठी गर्दी होण्याची शक्यता असून त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होऊ शकते. तसेच प्रवाशांवर आर्थिक भारही पडणार आहे. भीमा कोरेगाव मानवंदना कार्यक्रमात नागरिक स्वखुशीने, शांततेत व मोठ्या श्रद्धेने सहभागी होत असतात. या पार्श्वभूमीवर नागरिकांना कोणतीही आर्थिक अडचण येऊ नये, यासाठी १ जानेवारी २०२६ रोजी राज्यातील सर्व टोल नाक्यांवरून जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी देण्यात यावी, अशी मागणी खा.सोनवणे यांनी केली आहे. या निर्णयामुळे जनतेला दिलासा मिळेल, टोल नाक्यांवरील गर्दी कमी होईल आणि एकूणच वाहतूक व्यवस्थापन सुलभ होण्यास मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. यासंदर्भात तातडीने आवश्यक आदेश निर्गमित करण्यात यावेत, अशी अपेक्षाही खा.सोनवणे यांनी प्रशासनाकडे व्यक्त केली आहे.