Breaking
Updated: ऑक्टोबर 13, 2025
महाराष्ट्रात उद्यापासून 4 दिवस वादळी पावसाची शक्यता
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelमुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात हवामान पूर्णपणे कोरडे होते, ज्यामुळे मान्सूनचा राज्यातून परतीचा प्रवास झाल्याचे बोलले जात होते. मात्र, आता नव्या अपडेट्सनुसार, हवामानात अचानक बदल होण्याची शक्यता आहे. 14 ऑक्टोबर पासून राज्यातील हवामानात परत एकदा बदल अपेक्षित असून किमान 18 ऑक्टोबरपर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान आणि दुपारनंतर वादळी पाऊस अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना काढणी केलेल्या पिकांची काळजी घेण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.
सध्याच्या अंदाजानुसार वादळी पावसाची सर्वाधिक शक्यता आणि प्रमाण हे विदर्भ आणि मराठवाड्यात असू शकते, जिथे या दरम्यान अनेक भागांमध्ये ढगाळ हवामान अथवा वादळी पावसाची शक्यता राहील. तुलनेत खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपाचा वादळी पाऊस पडू शकतो.
पुढील चार दिवस कुठे-कुठे पावसाची शक्यता?
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 14 ऑक्टोबर रोजी सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
15 ऑक्टोबर रोजी राज्यातील कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खान्देश आणि विदर्भातील बहुतांश भागात विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे.
16 ऑक्टोबर रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणीसह संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भातील नागपूर, वाशिम, बुलढाणा, अमरावती, अकोला या जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
17 ऑक्टोबर रोजी विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
हवामान विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन
काढणी केलेली धान्य, कडधान्य आणि फळपिक सुरक्षित ठिकाणी ठेवातीत. शेतातील पीके झाकण्यासाठी ताडपत्री, प्लास्टिकचा वापर करावा, पिकांना झाडांना आधार द्यावा, पिकांचे वाऱ्यापासून संरक्षण करावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. तसेच हवामान खात्याचे अपडेट्स नियमित तपासावेत आणि त्यानुसार पिकांची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
हवामानात बदल का?
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवामानात हा बदल होतो आहे. त्यामुळे नैऋत्य मान्सून संपला असला तरी पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीने अतोनात नुकसान
दरम्यान, याआधी झालेल्या पावसाने संपूर्ण राज्यात विशेषत: मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यात मोठा फटका बसला. अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अनेकांच्या घरात-दारांत पाणी शिरले, पिके पाण्याखाली आली. पिकांसह शेतातील मातीही खरडून गेली. गुरे वाहून गेली, घर-संसार उघड्यावर केला. आता पुन्हा पावसाचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचं सांगण्यात आलं आहे.