Breaking

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज

Updated: ऑक्टोबर 7, 2025

By Vivek Sindhu

मराठवाडा शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून ३१ हजार ६२८ कोटींचं मदतपॅकेज

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

मुंबई : अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत तब्बल ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचं मदतपॅकेज जाहीर केलं.

फडणवीस यांनी सांगितलं की, खरडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी ४७ हजार रुपये रोख देण्यात येणार असून मनरेगाच्या माध्यमातून आणखी ३ लाख रुपयांचं काम दिलं जाईल. बागायती शेतीसाठी हेक्टरी ३२ हजार ५०० रुपये, हंगामी बागायतीसाठी २७ हजार रुपये आणि रब्बी पिकांसाठी १० हजार रुपये दिले जातील. विम्याव्यतिरिक्त शेतकऱ्यांना हेक्टरी १७ हजार रुपयांची भरपाई मिळणार आहे.

कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्टरी ३५ हजार रुपयांची मदत मिळेल. दुधाळ जनावरांसाठी ३७ हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येईल, तर गाळ भरलेल्या विहिरींसाठी ३० हजार रुपयांची मदत मिळेल. कुकुटपालनासाठी प्रति कोंबडी १०० रुपये आणि पडझड झालेल्या घरांसाठी नव्या बांधकामासाठी अनुदान देण्यात येईल. डोंगरी भागातील घरांना अतिरिक्त १० हजारांची मदत दिली जाणार आहे. तसेच, गोठेधारक आणि दुकानदारांना प्रत्येकी ५० हजार रुपये मिळणार आहेत.

परीक्षेच्या शुल्कात सवलत देण्याचंही सरकारनं जाहीर केलं आहे.
फडणवीस म्हणाले, “शेतकरी रब्बीचं पीक घेतो की नाही हे विचारत बसायचं नाही, आम्ही तातडीने १० हजार रुपयांची मदत देणार आहोत. विमा दाव्यांसाठी केंद्र सरकारकडूनही दबाव आणत आहोत. व्हॅलिडेशन प्रक्रियेला गती देत आहोत.”

राज्यातील शेतकऱ्यांसाठी जाहीर झालेलं हे आतापर्यंतचं सर्वात मोठं आर्थिक मदतपॅकेज असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं. डिसेंबर अधिवेशनात आणखी वाढीव मदतीचा विचार होईल, असंही त्यांनी नमूद केलं.


Categories

Recent Posts