Breaking
Updated: ऑक्टोबर 6, 2025
शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत देण्याची मागणी
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelशेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत देण्याची मागणी
केज – अतिवृष्टीने संपूर्ण पिकांचे नुकसान झाल्याने पंजाब सरकारच्या धर्तीवर शेतकऱ्यांना सरसगट हेक्टरी ५० हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात यावी, जनावरे मरण पावलेल्या शेतकऱ्यांना प्रत्येक जनावरामागे ४० हजार रुपयांची मदत देण्यात यासह विविध मागण्यांसाठी शेकाप व शेतकऱ्यांच्या वतीने कळंब – अंबाजोगाई रस्त्यावर युसुफवडगाव येथे सोमवारी सकाळी ११ वाजता एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
केज तालुक्यात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने सोयाबीन, कापूस, मूग, उडीद पिकांसह विविध फळबागांचे १०० टक्के नुकसान झाले आहे. तर पुरामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी पिकांसह खरडून गेल्या असून अनेक जनावरे मरण पावली आहेत. तर घरांची पडझड आणि शेतातील पशु निवाऱ्याचे सुद्धा खुप नुकसान झाले आहे. या अस्मानी संकटामुळे शेतकरी अडचणीत आला असून शेतकऱ्यांपुढे मुलांचे शिक्षण, मुलींचे लग्न आणि उदरनिर्वाह असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, गेल्या वर्षीचा राहिलेला पिकविमा द्यावा, या वर्षीचा पिकविमा तात्काळ मंजूर करावा. ओला दुष्काळ जाहीर करून सर्व योजना लागु कराव्यात, मरण पावलेल्या शेतकऱ्यांना सरसगट वीस लाख रुपये मदत जाहीर करावी, सोयाबीनचे अंतिम पिक कापणी प्रयोग शेतकऱ्यांच्या उपस्थितीत करावेत या मागण्यासाठी शेकाप व शेतकऱ्यांच्या वतीने कळंब – अंबाजोगाई रस्त्यावर युसुफवडगाव येथे सोमवारी सकाळी ११ वाजता एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी महसुलचे मंडळ अधिकारी विकास हजारे यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनामुळे या रस्त्यावरील वाहतूक एक तास ठप्प असल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
आंदोलनात शेकापचे भाई मोहन गुंड, माजी पं. स. सदस्य उमाकांत भुसारी, रुपेश बोरगावकर, मंगेश देशमुख, महेश गायकवाड, जयराज निशिगंध, सचिन उजगरे, रचलिंग पाटील, प्रभुलिंग निगडीकर,ओमकार लामतुरे, राहुल इंगळे, गणेश खानवरे, मयूर सुरवसे, दीपक नांदे, दादा निकम, उत्तरेश्वर खरबड, जयराज मुकदम, विकास जाधव, विजय शिंदे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.