Breaking
Updated: सप्टेंबर 2, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelमुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदान व मुंबईतील रस्त्यांवर गर्दी उसळल्याने उच्च न्यायालयाने थेट राज्य सरकारला इशारा दिला आहे. “आज दुपारी ३ वाजेपर्यंत शहरातील आंदोलकांना हटवा, मुंबई खाली करा. रस्त्यांवर जे सुरू आहे ते पूर्णपणे बेकायदेशीर आहे. जर आदेशाचे पालन झाले नाही तर कोर्ट ठोस कारवाई करेल,” असे न्यायालयाने स्पष्ट केले.
कोर्टाचा सरकारला अल्टिमेटम
न्यायालयाने सुनावणीदरम्यान सांगितले की, “२.४० वाजता आम्ही पुन्हा पाहू, तोपर्यंत सर्व रस्ते मोकळे झाले पाहिजेत. गरज पडली तर आमचा प्रतिनिधी किंवा आम्ही स्वतः पडताळणी करू. आदेशाचे पालन झाले नाही तर अवमानाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल.”
जरांगे ठाम : “मागण्या पूर्ण होईपर्यंत मुंबई सोडणार नाही”
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले असून आज आंदोलनाचा पाचवा दिवस आहे. आंदोलनाला अधिक तीव्र रूप येत असतानाच पोलिसांनी आझाद मैदान रिकामे करण्याची नोटीस दिली आहे. मात्र जरांगे यांनी “मराठे कुणाला घाबरत नाहीत, मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही,” असा पवित्रा घेतला आहे.
“परवानगी नसेल तर जरांगेंनाही बाजूला करा”
न्यायालयाने कठोर भूमिका घेत सांगितले की, “मनोज जरांगेंकडे आंदोलनाची परवानगी नसेल तर त्यांनाही बाजूला करा.” त्यामुळे आता जरांगे यांना मैदान सोडावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.