Breaking
Updated: ऑगस्ट 31, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelमुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलन निर्णायक टप्प्यात पोहोचले आहे. गेल्या तीन दिवसांपासून ते आमरण उपोषण करत आहेत. आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याची घोषणा केली. “उद्यापासून मी पाणी पिणं बंद करणार आहे,” असे जाहीर करत त्यांनी सरकारवर दबाव वाढवला.
जरांगे म्हणाले की, “७० वर्षांपासून मराठा समाज आरक्षणाची वाट पाहत आहे. गोरगरीब लोकांची ही वेदना आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून गरीब मराठा बांधव मुंबईला येत आहेत. कोणीही पैशासाठी त्रास करून घेऊ नये. गोरगरीब मराठ्यांनी कुणालाही पैसा द्यायचा नाही. जेवण आणून वाटायचं, गाड्या मैदानात लावायच्या आणि थेट रेल्वेने आझाद मैदानावर यायचं.”
त्यांनी अन्नछत्र चालवणाऱ्यांना देखील इशारा दिला. “अन्नछत्रातून पैसे मागू नका, गरिबांचं रक्त पिऊ नका. मी थेट नावं घेईन. कोणी लोकसभेसाठी लोकांकडून पैसे घेतले, डिझेलचे हिशेब काढले, रेनकोट वाटले आणि त्यासाठी पैसे घेतले हे मला माहित आहे. महाराष्ट्राच्या मराठ्यांनी कोणालाही पैसा द्यायचा नाही,” असे ठणकावून ते म्हणाले.
सरकारकडून अद्याप मागण्यांची अंमलबजावणी झालेली नाही, त्यामुळे आता उपोषण आणखी कडक करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. *“मी काल आणि आज पाणी घेतलं, पण उद्यापासून पाणी पिणं बंद करतो. सरकारच्या लक्षात येत नसेल तर हीच आमची लढाई अधिक तीव्र होईल,”* असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे उद्यापासून मनोज जरांगे पाटीलांचे उपोषण अधिक तीव्र रूप धारण करणार असून, आंदोलनाची धग राज्यभरात आणखी वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.