Breaking
Updated: डिसेंबर 19, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelआष्टी : तालुक्यातील मेहर गल्ली येथे एका विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून स्वतःला पेटवून घेत जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मयत विवाहितेच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून आष्टी पोलीस ठाण्यात पतीसह पाच जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रुक्मिणी प्रदिप भालेराव असे मयत विवाहितेचे नाव आहे. त्यांनी १४ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास मेहर गल्ली येथील राहत्या घरी स्वतःला पेटवून घेतले होते. त्यानंतर त्यांच्यावर अंबाजोगाई येथील सरकारी दवाखान्यात उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान २१ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री साडेअकरा वाजता त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी भागवत राजेंद्र डोरले, वय ३८ वर्ष, राहणार वाघीरा, तालुका पाटोदा (सध्या राहणार देहू गाव, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, रुक्मिणी यांचे पती प्रदिप गोरखनाथ भालेराव (राहणार मेहेर गल्ली, आष्टी) हे नेकपूर येथे मुखबधिर शाळेत शिक्षक आहेत. प्रदिप यांनी पत्नीला कोणतीही माहिती न देता बँकेकडून कर्ज काढून आपली बहीण स्वाती हिला जमीन खरेदीसाठी पैसे दिले होते. या व्यवहाराबाबत रुक्मिणी यांनी पतीला विचारणा केली असता, नणंद स्वाती जालींदर सुरवसे, नंदावा जालींदर उर्फ बाबु सुरवसे (दोन्ही राहणार तांबा राजुरी), नणंद राणी महेश आगलावे (राहणार छत्रपती संभाजीनगर) आणि चुलत मामाचा मुलगा गणेश बप्पासाहेब जिरेकर (राहणार वैजाळा) यांनी रुक्मिणी यांना फोनवरून धमकावून सातत्याने मानसिक त्रास दिला. याच जाचाला कंटाळून रुक्मिणी यांनी टोकाचे पाऊल उचलले असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १०८ आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नामदेव यादवराव धनवडे करत आहेत.