Breaking
Updated: जानेवारी 8, 2026
अज्ञाताने पेटवला १२ एकर सोयाबीनचा ढीग; शेतकऱ्याचे मोठे नुकसान
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelपरळी: शेतात कापणी करून ठेवलेल्या सोयाबीनच्या ढिगाला अज्ञाताने आग लावून लाखो रुपयांचे नुकसान केल्याची घटना कौठळी शिवार परिसरात घडली आहे. अजित विजयकुमार भताने, वय ४० वर्षे, राहणार विद्यानगर परळी यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. भताने यांची कौठळी शिवारात १२ एकर शेती असून त्यांनी सोयाबीनची कापणी करून ढीग लावून ठेवला होता. १ जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात इसमाने या सोयाबीनच्या ढिगाला आग लावली.
या आगीत सोयाबीनचे पूर्ण पीक जळून खाक झाले असून आरोपीने शेतातील पाईपलाईनच्या तोट्यांचीही तोडफोड केली आहे. कष्टाने पिकवलेले धान्य अशा प्रकारे जळून गेल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या प्रकरणी ७ जानेवारी रोजी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके तैनात करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक पवार या गुन्ह्याचा तपास करत आहेत.