Breaking
Updated: जून 10, 2026
फसव्या कर्जमाफी आदेशाची जिल्हाकचेरीसमोर शेतकरी पुत्रांकडुन होळी
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड (प्रतिनिधी) – नागपूर येथे झालेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र शासनाने काढलेल्या शासन निर्णयात (जीआर) अनेक जाचक अटी व शर्ती घातल्याने मोठ्या संख्येने शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप शेतकरी हक्क मोर्चाचे नेते राजेंद्र आमटे यांच्यासह शेतकऱ्यांनी या जी आर ची होळी केली.
शेतकरी पुत्र संघटना व शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासन निर्णयाची प्रत जाळून निषेध आंदोलन करण्यात आले. तसेच गावोगावी जाऊन शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून सरसकट कर्जमाफीसाठी पुन्हा आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला.
राजेंद्र आमटे म्हणाले की, नागपूर आंदोलनानंतर जाहीर झालेल्या कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ अनेक शेतकऱ्यांना मिळणार नाही. अनेक बँकांनी शेतकऱ्यांची जुनी व नवी कर्जखाती एकत्रित केल्यामुळे अनेक पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहतील. तसेच यापूर्वीच्या कर्जमाफी योजनांचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाही नव्या योजनेतून वगळण्यात आले आहे.
सरकारने कर्जमाफीची घोषणा केली असली तरी तिचा लाभ केवळ कागदोपत्री राहणार असून शेतकऱ्यांच्या हातात प्रत्यक्ष काहीही पडणार नाही, असा आरोपही त्यांनी केला.
या आंदोलनात डॉ. गणेश ढवळे, प्रा. ज्ञानेश्वर राऊत, अमर शेख, डॉ. संजय तांदळे, इनुस शेख, सर्फराज खान, हनुमान घोडके, रामधन जमाले, भीमराव कुटे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.