Breaking
Updated: मे 2, 2026
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई: शिक्षणाच्या ओझ्याखाली दबलेला आणि अपयशाच्या भीतीपोटी आपल्या जन्मदात्यांपासून दुरावलेल्या एका तरुणाचा तब्बल आठ वर्षांनंतर आपल्या वडिलांशी पुनर्भेट झाली आहे. लातूर जिल्ह्यातील रहिवासी असलेला सत्यम महादेव हुडगे हा तरुण ९ मार्च २०१८ रोजी अंबाजोगाई येथून बेपत्ता झाला होता, ज्याचा शोध बीड पोलिसांनी तांत्रिक कौशल्याच्या जोरावर दिल्ली-गाझियाबाद परिसरातून लावला आहे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी २०२६ मध्ये राबवलेल्या विशेष शोध मोहिमेला मोठे यश आले असून, पोलीस निरीक्षक शरद जोगदंड आणि त्यांच्या पथकाने केलेल्या या संवेदनशील कामगिरीमुळे एका विखुरलेल्या कुटुंबाची पुन्हा एकदा सांधणी झाली आहे.
सत्यम हा अंबाजोगाई येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता, मात्र सतत मिळणारे अपयश आणि घरच्यांच्या अपेक्षांचे ओझे यामुळे तो मानसिक तणावात होता. याच नैराश्यातून त्याने आपल्या बँक खात्यातील सर्व रक्कम काढून घेतली आणि कोणालाही काहीही न सांगता घर सोडले. मुलाचा शोध न लागल्याने हताश झालेल्या वडिलांनी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. गेल्या आठ वर्षांपासून पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते, मात्र कोणताच सुगावा लागत नव्हता. अखेर पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी या प्रकरणाचा नव्याने पाठपुरावा करण्याचे आदेश दिले आणि तपासचक्राला वेग आला.
या गुंतागुंतीच्या प्रकरणात पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी तपासाची धुरा अत्यंत कौशल्याने सांभाळली. त्यांनी तांत्रिक सेलच्या मदतीने जुन्या माहितीचे विश्लेषण केले आणि सत्यम वापरत असलेला नवीन मोबाईल क्रमांक शोधून काढला. हे लोकेशन दिल्ली-गाझियाबाद परिसरात असल्याचे निष्पन्न होताच, पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी वडिलांशी सतत संपर्क साधून त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन आणि तांत्रिक माहिती पुरवली. पोलिसांच्या या अचूक समन्वयामुळे वडिलांना दिल्ली गाठणे शक्य झाले आणि तिथे आपला मुलगा सुरक्षित असल्याचे पाहून त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले.
सत्यमने या आठ वर्षांच्या काळात स्वतःचे स्वतंत्र आयुष्य उभे केले असून तो तिथे भागीदारीत कुरिअर व्यवसाय करत आहे आणि त्याने विवाह देखील केला असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस निरीक्षक शरद जोगदंड आणि पोलीस हवालदार पांडुरंग काळे यांनी केलेल्या या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच एका पित्याची आपल्या मुलाला पाहण्याची दीर्घकालीन प्रतीक्षा संपली आहे. या यशस्वी कामगिरीबद्दल पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी या घटनेच्या निमित्ताने पालकांना आणि विद्यार्थ्यांना एक महत्त्वाचे आवाहन केले आहे. सध्याच्या स्पर्धेच्या युगात पालक आणि मुलांमधील संवाद कमी होत चालला असून, शिक्षणाचा दबाव आणि अपयशाची भीती मुलांमध्ये नैराश्य निर्माण करत आहे. अशा परिस्थितीत मुलांनी टोकाचे पाऊल उचलण्यापेक्षा पालकांशी मनमोकळेपणाने संवाद साधणे आवश्यक आहे, तर पालकांनीही मुलांच्या मानसिकतेचा विचार करून त्यांच्यातील संवाद आणि संयम वाढवणे काळाची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.