Breaking
Updated: मार्च 13, 2026
सोन्याच्या दुकानातील नोकरानेच मारला पावणे सहा लाखांवर डल्ला
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज: तालुक्यातील तांबवा येथे जुन्या वादाची कुरापत काढून एका तरुणावर कोयत्याने आणि लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात खळबळ माजली आहे.
नरसिंग उर्फ संग्राम अभिमान चाटे, वय २५ वर्षे, व्यवसाय शेती, राहणार तांबवा, यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, १२ मार्च २०२६ रोजी दुपारी दीडच्या सुमारास संग्राम चाटे आणि त्यांचा मित्र अदित्य बडे हे तांबवा येथील जिल्हा परिषद शाळेजवळून मुख्य रस्त्याने जात असताना आरोपींनी त्यांची दुचाकी अडवली. यावेळी दया विलास चाटे याने जुन्या भांडणाची कुरापत काढून जिवे मारण्याच्या उद्देशाने संग्रामच्या डोक्यावर कोयत्याने वार केला, ज्यामध्ये संग्राम गंभीर जखमी झाला.
इतर आरोपींपैकी शरद परमेश्वर चाटे याने संग्रामच्या डोळ्यात मिरची पूड टाकली, तर अमोल अनिल ठोंबरे, सागर रामधन चाटे आणि गोट्या भालेकर यांनी लोखंडी रॉडने संग्रामच्या पाठीवर, खांद्यावर आणि मानेवर बेदम मारहाण केली. या हल्ल्यानंतर संग्राम बेशुद्ध पडला होता. त्याला तातडीने केज येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यामागे जुन्या वादाचे कारण असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत केज पोलिसांनी दया विलास चाटे, शरद परमेश्वर चाटे, अमोल अनिल ठोंबरे, सागर रामधन चाटे आणि गोट्या भालेकर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९, ११५(२), ११८(१), ११८(२), १८९(२), १९०, १९१(२), १९१(३), ३५१(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुकुमार बनसोडे करत आहेत.