Breaking
Updated: मार्च 12, 2026
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड: जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर रिफ्लेक्टर नसलेल्या ट्रॅक्टर आणि ट्रॉलीमुळे निष्पाप नागरिकांचे बळी जाण्याचे सत्र थांबताना दिसत नाही, ज्याचा प्रत्यय नुकत्याच घडलेल्या एका भीषण अपघातातून आला आहे. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास नांदूर फाट्याजवळ एका शिक्षकाला प्रशासकीय अनास्थेमुळे आपला जीव गमवावा लागला. या प्रकरणात ११ मार्च रोजी ट्रॅक्टर चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस आणि आरटीओ अधिकाऱ्यांच्या डोळ्यांदेखत विना-रिफ्लेक्टर आणि पार्किंग दिवे नसलेली ही वाहने बिनदिक्कतपणे धावत असतानाही त्यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई का केली जात नाही, असा संतप्त सवाल आता नागरिक करत आहेत.
या ताज्या घटनेत, खमरोद्दीन फारोकी हे शिक्षक आपले काम संपवून दुचाकीवरून परतत असताना, रस्त्याच्या मधोमध कोणत्याही सुरक्षा नियमांशिवाय उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला (क्र. MH44D3304) त्यांची पाठीमागून धडक बसली. या ट्रॅक्टरला रिफ्लेक्टर नसल्यामुळे आणि पार्किंग लाईट बंद असल्याने अंधारात हे वाहन चालकाला दिसलेच नाही, ज्यामुळे हा भीषण अपघात घडला. या अपघातात खमरोद्दीन यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर त्यांचे सहकारी लक्ष्मण करंजकर हे गंभीर जखमी झाले आहेत. नेकनूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी, प्रशासनाला जाग येण्यासाठी अजून किती जणांना जीव गमवावा लागेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
रात्रीच्या वेळी महामार्गावर उभी असलेली ही काळरूपी वाहने सर्वसामान्यांच्या जीवावर उठली आहेत. पोलीस आणि आरटीओ कर्मचाऱ्यांच्या समोरून हे ट्रॅक्टर जातात, मात्र अर्थपूर्ण तडजोडीमुळे की कर्तव्यात कसूर केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही, हे आता उघड सत्य झाले आहे. केवळ अपघात झाल्यानंतर गुन्हे दाखल करण्यापेक्षा, हे मृत्यूचे सापळे आधीच का रोखले जात नाहीत? प्रशासनाचा हा ढिम्मपणा जिल्ह्यासाठी साक्षात मृत्यूचा सापळा बनत असून, नागरिकांमधील संताप आता टोकाला पोहोचला आहे. जर तातडीने अशा वाहनांवर कठोर कारवाई झाली नाही, तर हा रोष रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.