Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

बीड जिल्ह्यात जलक्रांतीचा श्रीगणेशा

Updated: जानेवारी 19, 2026

By Vivek Sindhu

बीड जिल्ह्यात जलक्रांतीचा श्रीगणेशा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

१०३ किलोमीटर नदी पुनरुज्जीवनाच्या कामाला राक्षसवाडीतून सुरुवात

अंबाजोगाई: बीड जिल्ह्याच्या दुष्काळी पट्यात शाश्वत पाणीपुरवठा आणि शेती समृद्धीसाठी ग्लोबल विकास ट्रस्टने (GVT) एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. परळी, अंबाजोगाई आणि धारूर या तीन तालुक्यांतील नद्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. ग्लोबल विकास ट्रस्ट आणि सनफार्मा यांच्या संयुक्त विद्यमाने राक्षसवाडी येथून या जलसंधारणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पापनाशी, गुणवरा, सरस्वती आणि वान या चार प्रमुख नद्यांच्या खोलीकरणाचे आणि रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. यावर्षी एकूण १०३ किलोमीटर अंतराचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती ग्लोबल विकास ट्रस्टचे संस्थापक मयंक गांधी यांनी दिली आहे. केवळ नदीचा गाळ काढण्यावर न थांबता, भूगर्भातील पाणी पातळी वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ‘रिचार्ज शाफ्ट’ (GRA) बसवण्याचे कामही या प्रकल्पात समाविष्ट आहे.

नदीपात्राच्या या शास्त्रीय खोलीकरणामुळे पावसाळ्यातील पाण्याचा जास्तीत जास्त साठा जमिनीत जिरण्यास मदत होईल. याचा थेट परिणाम परिसरातील विहिरी आणि कूपनलिकांच्या पाणी पातळीवर होणार असून, शेतकऱ्यांना रब्बी आणि उन्हाळी पिकांसाठी शाश्वत पाणी उपलब्ध होणार आहे. पावसाळ्यात नद्यांना येणाऱ्या महापुराचा धोकाही या रुंदीकरणामुळे कमी होणार आहे, ज्यामुळे नदीकाठच्या शेतीचे होणारे नुकसान टाळता येईल.

दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प एक वरदान ठरणार आहे. स्थानिक प्रशासनाचे सहकार्य आणि सामाजिक संस्थांच्या या पुढाकारामुळे जलसंधारणाच्या कामाला मोठी गती मिळाली आहे. येत्या काही महिन्यांत हे १०३ किलोमीटरचे काम पूर्ण झाल्यानंतर परिसराचा कायापालट झालेला पाहायला मिळेल, असा विश्वास मयंक गांधी यांनी व्यक्त केला आहे.


Categories

Recent Posts