Breaking
Updated: May 26, 2025
WhatsApp Group
Join Nowआष्टी – अहिल्यानगर ते बीड राष्ट्रीय महामार्गावरील साबलखेड ते आष्टी दरम्यान असलेल्या शेरी बुद्रुक येथील पुल बांधकामात कंत्राटदार, प्रशासनाने केलेल्या दिरंगाईचा फटका वाहनधारचालक, नागरीकांना सहन करावा लागत आहेत. पुलाचे काम रखडल्याने प्रशासनाने सिमेंटच्या नळ्या टाकून केलेला तात्पुरता पुल शनिवार (२४ मे) रोजी अवकाळी पावसाच्या पाण्यात वाहुन गेला.
यामुळे प्रशासनाने या मार्गावरील वाहतुक वीस किलोमीटर अंतरावरून वळवली. दरम्यान प्रशासनाकडून वाहुन गेलेला तात्पुरता पुल पुन्हा दुरुस्त केला. परंतु काम थातुरमातुर केल्याने रविवार (२५ मे) रोजी दुपारी झालेल्या मुसळधार पावसाच्या पाण्यामुळे पुल पुन्हा वाहुन गेल्याने वाहतुक पुन्हा वळवण्यात आली. यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागला.
साबलखेड ते आष्टी दरम्यान १७ किलोमीटर रस्त्याचे सिमेट काँक्रीटीकरणचे काम दोन वर्षांपासून केले जात आहे. परंतु रस्त्याचे काम अद्यापही न झाल्याने मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारक व परिसरातील नागरीकांना खड्डेमय व मातीमय रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे.
याच दरम्यान शिरी बुद्रुक, जळगाव, कासारी नदीवर पुल आहेत. परंतु या तिन्हीपैकी एकाही पुलाचे काम पुर्णत्वास नेण्याचे दायीत्व कंत्राटदाराने दाखवले नाही. रस्त्यावर दररोज अपघात होत असुन नागरीकांचा जीव धोक्यात आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देवून सबंधीत कंत्राटदाराविरूध्द कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. परंतु अभियंता राजेंद्र भोपळे हे कंत्राटदाराचे हित जपत काम कागदोपत्री ओके असल्याचे दाखवत असल्याचा आरोपही नागरीकांमधून केला जात आहे.
यावर प्रशासन काय उपाययोजना करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तहसीलदार वैशाली पाटील यांनी केली पुलाची पाहणी आष्टीच्या तहसीलदार वैशाली पाटील यांनी रविवार झालेल्या पावसामुळे शेरी बुद्रुक येथील वाहुन गेलेल्या पुलाची पाहणी केली. पावसाळ्याला नेमकीच सुरुवात होत आहे.
अगदी सुरुवातीलाच सदरील ठिकाणी अशा प्रकारची आपत्तीजनक स्थिती निर्माण होत असल्याने येणाऱ्या काळात सदरील मार्ग बहुतांशवेळा बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर येणार आहे. यामुळे तहसीलदार पाटील यांनी या पुलाच्या मजबुतीकरणासाठी व अर्धवट पुलाचे काम लवकर पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा परिसरातील नागरीकांकडून व्यक्त केली जात आहे.