Breaking

राज्यात मान्सूनची वेगाने आगेकूच

राज्यात मान्सूनची वेगाने आगेकूच

मराठवाडा, विदर्भात दोन दिवसांचा यलो अलर्ट

छत्रपती संभाजीनगर – मान्सूनचा वेग पुन्हा वाढल्यामुळे 25 जूनपर्यंत दिल्लीसह वायव्य भारतातील बहुतांश भागांमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. हवामान विभागानुसार 18 जूनपर्यंत मान्सून मध्य आणि पूर्व भारतातील उर्वरित भागांमध्ये तसेच वायव्य भारतातील काही भागांमध्ये पोहोचेल.

त्यानंतर 19 ते 25 जून दरम्यान हा वायव्य भारतातील बहुतांश भाग व्यापेल. रखडलेला मान्सून महाराष्ट्रातही सक्रिय झाला आहे. पुढील ४८ तासांत मान्सून संपूर्ण विदर्भ व्यापणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. कोकणात अति मुसळधार, मध्य महाराष्ट्रात मुसळधार तर मराठवाडा व विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला.


दक्षिण-पश्चिम मान्सूनने महाराष्ट्रात दमदार प्रवेश केला असून, कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाडा या चारही विभागांत पावसाने चांगली हजेरी लावली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सूनने राज्यात वेगाने आगेकूच केली असून अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.

शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक स्थिती मानली जात आहे. पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज पुढील दोन दिवसांत महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.

घाटमाथ्यावर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर परिसरात पावसाच्या सरी कायम राहतील. विदर्भात काही भागांत यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पावसामुळे पेरणीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.


कोकणात जोरदार सुरुवात

कोकण किनारपट्टीवर मान्सूनने नेहमीप्रमाणेच जोरदार सुरुवात केली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघर जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवड्यात सतत पावसाची नोंद होत असून अनेक ठिकाणी 100 मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला आहे. मुंबईतही 12 जूनपासून पावसाने दमदार हजेरी लावली असून गुरुवारी (13 जून) शहरात 80 मिमी तर उपनगरात 110 मिमी इतकी पावसाची नोंद झाली. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतुकीस अडथळे आले असून बेस्टच्या काही बस सेवा विलंबाने धावत आहेत.


मध्य महाराष्ट्रात समाधानकारक पावसाची नोंद

नाशिक, पुणे, सातारा, सोलापूर, अहमदनगर या जिल्ह्यांमध्येही मान्सून सक्रिय झाला आहे. काही ठिकाणी पावसाची संततधार असून, शेतकऱ्यांनी पेरण्या सुरू करण्याची तयारी केली आहे. हवामान विभागाने सांगितले की, पुढील पाच दिवस मध्य महाराष्ट्रात विजांसह मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.


मराठवाड्यातही दिलासा


मराठवाडा हा पावसाच्या दृष्टीने कायमच असमाधानी राहिलेला भाग मानला जातो, मात्र यंदा मान्सूनची वेळेत एन्ट्री झाली आहे. छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, लातूर आणि नांदेडमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरू असून शेतकऱ्यांमध्ये आशा निर्माण झाली आहे. काही भागांत शेतकरी खत-बियाण्यांची खरेदी करत असल्याचे दिसून येत आहे.
विदर्भात पावसाची चांगली सुरुवात
विदर्भातील नागपूर, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांत जोरदार पावसाने सुरुवात केली आहे. यवतमाळ जिल्ह्यात काही भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. नागपूरमध्ये13 जूनला 75 मिमी पावसाची नोंद झाली. भारतीय हवामान विभागाने यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर येथे यलो अलर्ट जारी केला आहे.
धरण साठ्यांमध्ये हळूहळू वाढ
राज्यातील प्रमुख धरणांमध्ये अद्याप मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला नसला तरी सुरुवातीचा पाऊस समाधानकारक ठरत आहे. कोयना, उजनी, जायकवाडी, भातसा, मुळा, पानशेत या धरणांमध्ये पाणी साठ्यात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. जलसंपदा विभागाने सांगितले की, पावसाची ही सुरुवात अशीच नियमित राहिली तर पुढील काही आठवड्यांत पाणीटंचाईच्या भीतीतून दिलासा मिळू शकतो.
हवामान खात्याचा पुढील अंदाज
भारतीय हवामान खात्यानुसार पुढील 5-7 दिवस राज्यात वाऱ्याच्या वेगासह पावसाची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोकण व घाटमाथ्यावर दरड कोसळण्याचा धोका लक्षात घेता पर्यटनासाठी गेलेल्या नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी थांबावे, असेही सांगण्यात आले आहे.
शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी तयारी सुरू केली
पावसाच्या आगमनानंतर राज्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी तयारी सुरू केली आहे. बी-बियाण्यांची दुकाने गर्दीने भरली असून शेतकऱ्यांनी नांगरणी, टोकणीची कामे वेगाने सुरू केली आहेत. कृषी विभागाने शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे की, पुढील चार-पाच दिवस पावसाची स्थिती पाहून पेरण्या कराव्यात जेणेकरून पिकांचे नुकसान होणार नाही.
सततची सतर्कता व नियोजन आवश्यक
एकूणच पाहता, यंदा मान्सूनने वेळेवर महाराष्ट्रात प्रवेश केला असून, सर्वच भागांत समाधानकारक पावसाची नोंद होत आहे. राज्यातील शेतकरी, प्रशासन व नागरिक यांच्यासाठी ही सुखद बातमी असून आगामी दिवसांत पावसाचे प्रमाण असेच कायम राहिल्यास राज्याला यंदा चांगला खरीप हंगाम अनुभवता येईल, अशी अपेक्षा आहे. मात्र हवामान बदलांचा परिणाम लक्षात घेता सततची सतर्कता व नियोजन आवश्यक राहील.
दिल्लीत वादळाचा इशारा
हवामान विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, दिल्लीमध्ये सलग चार दिवस उष्णतेची लाट होती. परंतु शुक्रवारी तापमानात थोडी घट झाली. शुक्रवारी संध्याकाळी वादळाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मान्सून 22-23 जूनपर्यंत दिल्लीमध्ये पोहोचू शकतो.

Last Updated: June 16, 2025

By Vivek Sindhu

About Author

विवेक सिंधु हे बीड जिल्ह्यातील सर्वात जलद आणी अग्रगण्य न्यूज पोर्टल आहे, जे तुम्हाला तुमच्या भागातील घडामोडींचे ताजे अपडेट्स देते. आम्ही बीड जिल्यातील सर्व महत्वाच्या घटनांचे, कार्यक्रमांचे, राजकीय घडामोडींचे व समाजघटकांशी निगडित बातम्यांचे वस्तुनिष्ठ व जलद अपडेट्स देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहोत.

Share This Post

ग्रुप जॉईन करा