Breaking
मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची झालेली अचानक व गुप्त भेट महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी ठरली आहे. ही भेट पूर्वनियोजित नसल्याचं सांगितलं जात असलं तरी, त्यामागे मोठी राजकीय रणनीती असल्याचा स्पष्ट संकेत मिळतो.
गेल्या काही आठवड्यांपासून मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना युतीबाबत चर्चा रंगत होत्या. दोन्ही बाजूंनी सकारात्मक सूर होता. मात्र, फडणवीस-राज भेटीनंतर या संभाव्य युतीवर ‘ब्रेक’ लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज ठाकरे यांना भाजपच्या जवळ आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी हा डाव खेळल्याचा अंदाज अनेक राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत. ही भेट मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची ठरू शकते.
राजकारणातील अत्यंत रणनीतिक खेळाडू म्हणून ओळखले जाणारे फडणवीस योग्य वेळ साधून राज ठाकरे यांच्याशी चर्चा करून ठाकरे बंधूंच्या युतीपासून त्यांना परावृत्त करत असल्याचं भासतंय.
जर मनसे आणि भाजप यांच्यात समन्वय किंवा युती झाली, तर उद्धव ठाकरे यांच्या गटासाठी हा मोठा धक्का ठरू शकतो. विशेषतः मुंबई, ठाणे आणि नाशिकसारख्या महानगरपालिकांमध्ये मनसेच्या मतांमुळे समीकरणं पूर्णपणे बदलू शकतात.
राज ठाकरे – देवेंद्र फडणवीस यांची भेट ही महाराष्ट्रातील आगामी महानगरपालिका व विधानसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनातून अत्यंत निर्णायक ठरू शकते. ठाकरे बंधू एकत्र येणार या आशेवर ही भेट पाणी फेरू शकते, आणि राजकीय समीकरणं नव्यानं आखली जातील, असं स्पष्टपणे दिसतंय.
Last Updated: June 12, 2025
Share This Post