Breaking
Updated: जानेवारी 28, 2026
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबारामती: राज्याच्या राजकारणाला हादरवून टाकणारी एक अत्यंत दुर्दैवी घटना आज सकाळी बारामतीमध्ये घडली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले असून त्यांच्यासह विमानात असलेल्या अन्य चार जणांचाही या भीषण दुर्घटनेत अंत झाला आहे. दाट धुक्यामुळे कमी झालेली दृश्यमानता आणि लँडिंगचा अयशस्वी ठरलेला प्रयत्न यांमुळे हे विमान धावपट्टीजवळ कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, व्हीएसआर कंपनीच्या या लिअरजेट ४५ विमानाची धुरा कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांभवी पाठक यांच्याकडे होती. आज सकाळी बारामती परिसरात दाट धुके असल्याने वैमानिकांना धावपट्टी शोधताना अडचणी येत होत्या. वैमानिकांनी रनवे ११ वर विमान उतरवण्याचा पहिला प्रयत्न केला, मात्र दृश्यमानता अत्यंत कमी असल्याने त्यांना धावपट्टी स्पष्ट दिसली नाही. त्यामुळे त्यांनी विमान पुन्हा वर घेतले आणि दुसऱ्यांदा उतरण्याचा प्रयत्न केला. यावेळी विमान धावपट्टीच्या अगदी जवळ पोहोचले होते, परंतु धावपट्टीला स्पर्श करण्यापूर्वीच विमानाचे नियंत्रण सुटले आणि ते उलटून जमिनीवर आदळले. अपघाताच्या अगदी काही सेकंद आधी कॅप्टन शांभवी पाठक यांचे ‘ओह शिट… ओह शिट’ हे शेवटचे शब्द विमानाच्या संवाद यंत्रणेत नोंदवले गेले आहेत, जे या प्रसंगाची भीषणता स्पष्ट करतात.

या भीषण अपघातात अजित पवार यांच्यासह त्यांचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी एचसी विदिप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक आणि फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी या पाचही जणांचा मृत्यू झाला. अजित पवार यांच्या हातातील घड्याळावरून त्यांच्या मृतदेहाची ओळख पटली.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, विमान जमिनीवर आदळताच एक मोठा स्फोट झाला आणि विमानाने क्षणात पेट घेतला. विमानातील इंधनामुळे त्यानंतरही एकामागून एक चार-पाच स्फोट झाले. स्थानिक नागरिक मदतीसाठी धावले, मात्र आगीचा वेढ इतका मोठा होता की कोणालाही वाचवणे शक्य झाले नाही.

नागरी उड्डयन महासंचालनालयाने (DGCA) या दुर्घटनेला दुजोरा दिला असून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.
