शोकाकुल वातावरणात जिजांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप
परळी – आश्रू पुसत आणि हुंदके आवरत असलेल्या वृध्द माता-भगिनी, मुश्किलीने आश्रू आवरणारे असंख्य कार्यकर्ते आणि आक्रोश करणारे देशमुख कुटुंबीय अशा शोकाकुल आणि भावपूर्ण वातावरणात माजी आमदार आर. टी. देशमुख जिजा यांच्या पार्थिवावर परळीत शासकीय शिष्टाचारात अंत्यसंस्कार करण्यात आले.
जिजा यांच्या निवासस्थान परिसरात हजारोंच्या उपस्थितीत जिजांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. निष्ठा आणि प्रामाणिकपणाचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे जिजा असल्याचे प्रतिपादन पशुसंवर्धन, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी केले.
माजलगावचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांचे सोमवारी अपघाती निधन झाले. त्यांचा मुलगा बाहेर देशातुन आल्यानंतर आज बुधवार दिनांक 28 मे रोजी आ. टी. देशमुख यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पुर्वी आज पहाटे जिजांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. येथे सर्वांसाठी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. माजलगांव, परळी वैजनाथ विधानसभा मतदारसंघातील नेते, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांनी रांगा लावुन आपल्या लाडक्या नेत्याचे अंतिम दर्शन घेतले.
सकाळी 10.45 वाजता अंत्ययात्रा निघुन 11 वाजता पार्थिव अंत्यसंस्कार करण्याच्या ठिकाणी आले. यावेळी प्रथम शासनाच्यावतीने पशुसंवर्धन, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर खा. बजरंग सोनवणे, खा. ओमराजे निंबाळकर, आ. राजेश विटेकर, डॉ. रत्नाकर गुट्टे, सौ. राजश्रीताई धनंजय मुंडे, अक्षय मुंदडा, शासनाचे प्रतिनिधी अप्पर जिल्हाधिकारी अश्विनी जिरांगे, ऊप जिल्हाधिकारी अरविंद लाटकर, तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी पुष्पचक्र अर्पण केले. नंतर वेदीक पध्दीने मंत्रोच्चाराच्या घोषात जेष्ठ पुत्र. देशमुख यांनी जिजांच्या पार्थिवाला अग्नी दिला.
यावेळी आ. राजेश विटेकर, डॉ. रत्नाकर गुट्टे, खा. ओमराजे निंबाळकर, खा. बजरंग सोनवणे, फुलचंद कराड आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी माजी मंत्री पंडितराव दौंड, माजी आमदार बाजीराव जगताप, डॉ. मधुसुदन केंद्रे, सौ. संगिता ठोंबरे, नांदेड पोलिस महासंचालक शहाजी उमाप, सौ. उषाताई दराडे आदी उपस्थित होते.