Breaking
Updated: नोव्हेंबर 4, 2025
राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकींची घोषणा
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channel2 डिसेंबरला मतदान, 3 डिसेंबरला मतमोजणी; आचारसंहिता लागू
मुंबई : राज्यातील 246 नगरपरिषद आणि 42 नगरपंचायती अशा 288 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2 डिसेंबर 2025 रोजी घेण्यात येणार असून 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होईल. राज्य निवडणूक आयुक्त सुदेश वाघमारे यांनी सचिवालयातील पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यानुसार राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे.
निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यास 10 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असून अंतिम तारीख 17 नोव्हेंबर आहे. अर्जांची छाननी 18 नोव्हेंबरला होईल. अपील नसलेल्या ठिकाणी माघार घेण्याची अंतिम मुदत 21 नोव्हेंबर तर अपील असलेल्या ठिकाणी 25 नोव्हेंबरपर्यंत राहणार आहे.
मतदान सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत घेतले जाणार असून मतमोजणी 3 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच संबंधित क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे.
राज्यातील मतदानासाठी सुमारे 13 हजार 355 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदारसंख्या एक कोटी 7 लाख 3 हजार 576 आहे. नगरपरिषदांमध्ये बहुसदस्यीय तर नगरपंचायतींमध्ये एकसदस्यीय पद्धतीने निवडणुका घेतल्या जाणार आहेत. ईव्हीएमचा वापर होणार आहे.
नामांकन आणि शपथपत्र ऑनलाइन भरता येईल. मतदारांना नाव शोधण्यासाठी स्वतंत्र संकेतस्थळ व मोबाईल अॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे. सुरक्षित, पारदर्शक आणि सुरळीत निवडणुका पार पाडण्यासाठी राज्य प्रशासनाला आवश्यक सूचना देण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले.