Breaking
WhatsApp Group
Join Nowराजकिशोर मोदी यांच्या वतीने आदित्यच्या यशाचा सन्मान
अंबाजोगाई (प्रतिनिधी) – अंबाजोगाई शहरातील मंगळवार पेठ भागातील रहिवाशी असलेल्या ऊसतोड कामगाराचा मुलगा चि. आदित्य दिलीप जाधव (वय १७) या तरुणाने एशियन चॅम्पियन शिप मध्ये रौप्यपदक पटकावत आपल्या उल्लेखनीय कामगिरीने अंबाजोगाई शहरासह संपूर्ण भारत देशाची मान उंचावली आहे. व्हिएतनाम येथे नुकत्याच पार पडलेल्या एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेत ४८ किलो वजनी गटात रौप्यपदक (सिल्वर मेडल) पटकावून आदित्यने जागतिक पातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
आपल्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीवर मात करत अपार मेहनत, कठोर सराव आणि आत्मविश्वासाच्या जोरावर आदित्य जाधवने हे दैदिप्यमान यश मिळवले आहे. त्याची ही झेप केवळ वैयक्तिक नाही, तर लाखो गरीब घरातील तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.चि आदित्यची प्रेरणा इतर तरुण घेऊन अपार मेहनत तथा कष्टाने त्यांच्यासारखेच यश संपादन करून समाजाचे त्याचबरोबर आपल्या देशाचे नाव उज्वल करतील अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी आदित्यचा सत्कार व सन्मान करतांना व्यक्त केली.
आपल्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थिती ला दोष न देता त्याने केलेल्या कष्टाचे हे फलित असल्याचे देखील राजकिशोर मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले. अंबाजोगाई पिपल्स बँकेचे मुख्यालय सहकार भवन येथे नुकताच आदित्य जाधवचा शाल व फेटा बांधून सन्मान करण्यात आला.
यावेळी पुढे बोलताना राजकिशोर मोदी म्हणाले की अशा मेहनती, जिद्दी आणि संघर्षातून वर आलेल्या मुलांना वेळेवर योग्य दिशा आणि पाठबळ दिलं, तर तेभविष्यात देशाचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नक्कीच उज्वल करतात. आदित्य सारख्या मुलांमधूनच नव्या भारताची उमेद आहे.
त्याचे यश हे केवळ अंबाजोगाई शहरासाठीच नव्हे तर संपूर्ण भारत देशासाठी अभिमानास्पद बाब असल्याचे मोदी यांनी या सत्कार प्रसंगी नमूद केले. त्याच्याकडून भविष्यात देखील ऑलिम्पिक मध्येही पदक मिळवण्याची अपेक्षा आपण नक्की बाळगू शकतो असा विश्वास देखील राजकिशोर मोदी यांनी व्यक्त केला. यावेळी आदित्यच्या पालक, प्रशिक्षक व त्याच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन व कौतुक राजकिशोर मोदी यांनी केले आहे.
आपल्या सत्काराला उत्तर देतांना आदित्यने काटेकोर प्रशिक्षण, आहार, नियमित व्यायामासोबतच योग्य प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्वतःची प्रबळ इच्छाशक्ती यांच्या जोरावरच आपन हा यशस्वी प्रवास केला असल्याचे सांगितले.क्रीडा क्षेत्रात अडथळे असले तरी हार न मानता चिकाटीने पुढे जाण्याची जिद्द ठेवण्याचे आवाहन यावेळी आदित्य जाधव याने केले आहे.
त्याच्या या यशस्वी व दैदिप्यमान कामगिरीमुळे अंबाजोगाईच्या तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
या सत्कार प्रसंगी आदित्यच्या नातेवाईकासह माजी नगरसेवक दिनेश भराडिया, दत्ता सरवदे, रफिक गवळी, विजय रापतवार, वजीर शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. राजकिशोर मोदी यांनी आदित्यच्या यशाचं कौतुक करत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Last Updated: July 3, 2025