Breaking
Updated: सप्टेंबर 20, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई : शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्याच्या वतीने महत्त्वाचे आवाहन करण्यात आले आहे. शाळा, कॉलेज, बसस्टँड, दुचाकी व चारचाकी परिसरात मुलींच्या गाड्यांच्या पाठीमागे फिरणारे टोळके, रात्री गाड्यांवर केक ठेवून वाढदिवस साजरे करणारे, सायलेंसर मॉडिफाय करून मोठा आवाज करत वाहन चालवणारे तरुण तसेच मोठ्या आवाजात साऊंड लावून गाणी वाजवणारे ऑटोचालक यांच्यावर कारवाईसाठी नागरिकांनी पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्वजनिक ठिकाणी अराजकता निर्माण करणारे, दारू पिऊन रस्त्यावर हुल्लडबाजी करणारे, तसेच आद्यकवी मुकुंदराज स्वामी समाधी, रेणुका माता मंदिर परिसरात किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी अवैध वर्तन करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. शहरात शिस्त राखण्यासाठी असे प्रकार नागरिकांनी त्वरित पोलिसांच्या निदर्शनास आणून द्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
यासाठी नागरिकांना विशेष हेल्पलाईन क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आला आहे. संशयित व्यक्तींच्या गाड्या अथवा ऑटोचे नंबर प्लेट स्पष्ट दिसतील अशा फोटोंसह तक्रार मोबाईल क्रमांक ९२२५०९२८२३ वर पाठवता येणार आहे. तक्रार करणाऱ्या नागरिकांचे नाव व क्रमांक गोपनीय ठेवले जाईल, अशी हमी पोलिस प्रशासनाने दिली आहे.
पोलिसांनी स्पष्ट केले की, अशा प्रकारच्या गुन्हेगारी व समाजविघातक प्रवृत्तीविरुद्ध तातडीने कारवाई केली जाईल. त्यामुळे नागरिकांनी धाडसाने पुढे येऊन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन अंबाजोगाई शहर पोलिसांनी केले आहे.
या मोहिमेच्या माध्यमातून नागरिकांच्या सहकार्याने शहराचा चेहरा अधिक सुरक्षित आणि शांततापूर्ण करण्याचा निर्धार असल्याचे पोलीस निरिक्षक शरद जोगदंड यांनी सांगितले.