Breaking
Updated: एप्रिल 9, 2026
गहिनीनाथ गडावर फडणवीसांचे भाष्य चर्चेत
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड – नाशिकमधील आयटी कंपनीत घडलेल्या गंभीर प्रकारावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाम भूमिका घेत सखोल तपास करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. बीड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडावर आयोजित 94 व्या नारळी सप्ताहाच्या सांगता सोहळ्यात सहभागी होत त्यांनी या प्रकरणावर भाष्य केले. याचबरोबर बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसशी संपर्क साधल्याची कबुली देत त्यांनी राजकीय चर्चेलाही वेगळं वळण दिलं.
नाशिकमध्ये काही आयटी कंपन्यांच्या माध्यमातून बेरोजगार तरुणींना नोकरीचे आमिष दाखवून त्यांना जाळ्यात ओढले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यानंतर त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करून धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचे आरोप आहेत. या प्रकरणात आतापर्यंत नऊ गुन्हे दाखल झाले असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे सांगत, अशा प्रकारचे कृत्य कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही, याचा सखोल तपास होईल, असे स्पष्ट केले.
दरम्यान, गहिनीनाथ गडावरील कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी धार्मिक आणि सामाजिक परंपरेचे महत्त्व अधोरेखित केले. वामनभाऊंचा वारसा विठ्ठल महाराज पुढे नेत आहेत. आम्ही इथे पदामुळे नाही, तर भक्त म्हणून आलो आहोत, असे सांगत त्यांनी भाविकांशी संवाद साधला. विशेष म्हणजे, या गडावर 2039 पर्यंतच्या नारळांचे बुकिंग झाले असल्याचा उल्लेख करत त्यांनी या परंपरेचे कौतुक केले. तसेच वारकरी संप्रदायाच्या सातत्याची आणि शिस्तीची प्रशंसा करत, पंढरपूर दिंडी मार्गासाठी आवश्यक सुविधा उभारण्याचे आश्वासन दिले.
सुरेश धस आणि धनंजय मुंडे एकत्र
या धार्मिक कार्यक्रमाला राजकीय रंगही चढल्याचे पाहायला मिळाले. मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडे हे सर्व नेते एकत्र आले होते. याआधी एकमेकांवर टीका करणारे हे नेते एकाच व्यासपीठावर दिसल्याने उपस्थितांमध्ये चर्चा रंगली. कार्यक्रमादरम्यान भाविकांनी धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्री करा, अशी जोरदार मागणी केली. या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी हसत प्रतिसाद दिला, मात्र यामुळे राजकीय वातावरणात नवीन चर्चांना उधाण आले आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांना फोन
याचवेळी बारामती पोटनिवडणुकीबाबत बोलताना फडणवीस यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून उमेदवारी मागे घेण्याची विनंती केल्याचे सांगितले. मी प्राजक्त तनपुरे यांनाही सांगितले होते आणि त्यांनी अर्ज मागे घेतला. त्याचप्रमाणे काँग्रेसनेही विचार करावा, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे बारामतीतील राजकीय समीकरणांवर याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा
मुख्यमंत्री फडणवीस यांनी माजी नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्यासोबतचा एक जुना फोटो मला भेट म्हणून मिळाला, ते पाहून मला खूप भावनिक वाटलं, असे ते म्हणाले. धार्मिक, सामाजिक आणि राजकीय अशा सर्वच अंगांनी महत्त्वपूर्ण ठरलेल्या या कार्यक्रमातून अनेक संदेश दिले गेले असून, आगामी काळात याचे परिणाम राज्याच्या राजकारणात दिसून येतील, अशी चर्चा सुरू झाली आहे.