Breaking
Updated: May 29, 2025
WhatsApp Group
Join Now बीड - जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न समजावून घेऊन त्यावर वेळीच मार्ग काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार मंगळवार आणि गुरुवार या दिवशी जनता दरबार आयोजित करण्यात येत आहे. यातील बहुसंख्य प्रश्न उपविभाग आणि तालुकास्तरावर सुटण्यासारखे आहेत यामुळे आगामी काळात उपविभाग आणि तालुकास्तरावर जनता दरबार आयोजित करण्यात यावे असे परिपत्रक जिल्हाधिकारी बीड यांच्यातर्फे जारी करण्यात आले आहे.
लोकांचे प्रश्न समजावून घेऊन वेळेवर सोडवणूक करण्यासाठी शासनाने अभ्यागतांसाठी वेळ राखून ठेवण्याचे निर्देश 15 फेब्रुवारी 2018 च्या शासन निर्णयाद्वारे जारी केलेले आहेत त्यानुसार जिल्हास्तरावर आठवड्यातून तीन दिवस जनता दरबारचे आयोजन करण्यात येत आहे.
उपविभाग आणि तालुकास्तरावर जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक होत नसल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित होत असलेल्या या जनता दरबारात मोठी गर्दी होत आहे, या पार्श्वभूमीवर हे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
तालुकास्तरावर या पुढील काळात प्रत्येक तहसील कार्यालयात सोमवार आणि गुरुवार या आठवड्यातील दोन दिवस जनता दरबाराचे आयोजन करण्याचे या परिपत्रकात निर्देशित करण्यात आले आहे.
सर्व उपविभागीय अधिकारी यांनी त्यांच्या उपविभागातील एका तालुक्यात त्यांच्या सोयीनुसार या जनता दरबारात उपस्थित राहावे असेही या परिपत्रकात म्हटले आहे.
प्रत्येक सोमवार आणि गुरुवार हा जनता दरबार होईल, यात दुपारी 12 ते 2 या वेळेस जनतेचे प्रश्न समजून घेऊन त्याचे निराकरण करावे तसेच या दिवशी संबंधित अधिकाऱ्याने दौरा अथवा बैठकीचे आयोजन करू नये असे या परिपत्रकात म्हटले असून जनता दरबार मध्ये भेट दिलेल्या अभ्यागतांची संख्या आणि करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल दर महिन्याच्या पाच तारखेला मासिक दैनंदिनी जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावा असेही निर्देशित करण्यात आले आहे.