Breaking
Updated: जानेवारी 1, 2026
शिक्षक भरतीसाठी गुड न्यूज! मे २०२६ अखेरची रिक्त पदे भरतीसाठी विचारात घेण्यास राज्य सरकारची मान्यता
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelमुंबई: १ जानेवारी २०२६महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील शिक्षक उमेदवारांना मोठा दिलासा दिला आहे. पवित्र पोर्टलमार्फत केल्या जाणाऱ्या शिक्षक पदभरतीमध्ये आता शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या अखेरीस, म्हणजेच मे २०२६ पर्यंत रिक्त होणाऱ्या संभाव्य पदांचाही समावेश करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. ही पदभरती प्रक्रिया ‘शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी-२०२५’ (TAIT) मधील गुणांच्या आधारावर राबवली जाणार आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ नुसार शाळांमधील १० टक्क्यांपेक्षा अधिक पदे रिक्त ठेवता येत नाहीत. मात्र, दरवर्षी सेवानिवृत्ती आणि संचमान्यतेमुळे अनेक पदे रिक्त होतात. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आणि शाळांना पुरेसे शिक्षक उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील भरतीचा मार्ग सुकर झाला आहे.
पूर्वीच्या शासन निर्णयानुसार ८० टक्क्यांपर्यंत रिक्त पदे भरण्याची तरतूद होती. आता मे २०२६ पर्यंतची संभाव्य रिक्त पदे गृहीत धरल्यामुळे भरती प्रक्रियेत जागांची संख्या वाढणार असून, जास्तीत जास्त उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाचे उप सचिव आबासाहेब कवळे यांच्या स्वाक्षरीने आज हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.