बीड : मान्सूनपूर्व कालावधीत शेतकरी मशागतीच्या कामात व्यस्त असताना जमिनीच्या मालकीहक्कावरून अनेकदा शेतकऱ्यांमध्ये वाद निर्माण होतात. या वादांमधून गंभीर गुन्ह्यांची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी ‘पोलीस आपल्या पापल्या बांधावर’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे.

या उपक्रमामुळे शेतजमिनीशी संबंधित वाद निर्माण होताच पोलीस यंत्रणा तत्काळ सजग होऊन त्या वादात सामंजस्य व कायदेशीर मार्गदर्शनाच्या आधारे मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी तक्रारदाराशी संवाद साधून, बीट अंमलदारांच्या मदतीने प्रत्यक्ष बांधावर भेट देत वस्तुस्थितीची खात्री करण्याचे निर्देश दिले आहेत.

गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, तंटामुक्ती समितीचे सदस्य व शेजारी शेतकरी यांच्या समवेत चर्चा करून प्रकरणाचे गांभीर्य समजून घेण्यात येईल. गरज पडल्यास प्रतिबंधात्मक कारवाईचीही अंमलबजावणी केली जाईल.

या उपक्रमामुळे वाद सुरुवातीलाच मिटून मोठ्या गुन्ह्यांना प्रतिबंध होणार आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टळणार असून, कायदेशीर मार्गदर्शन सहज उपलब्ध होणार आहे.

हा उपक्रम ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासा ठरत असून, शेतजमिनीवरचा तणाव दूर करून सामाजिक सलोखा प्रस्थापित करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. बीड पोलीसांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.