Breaking

सरपंच आंधळे खून प्रकरणातील आरोपींचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

Updated: July 5, 2025

By Vivek Sindhu

सरपंच आंधळे खून प्रकरणातील आरोपींचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा

Join Group


विशेष सरकारी वकील अ‍ॅड. अशोक कवडे यांचा युक्तिवाद ग्राह्य

अंबाजोगाई : परळी वैजनाथ येथील सरपंच बापूराव बाबुराव आंधळे यांच्या खूनप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालय, अंबाजोगाई यांनी फेटाळून लावला आहे.

दिनांक 29 जून 2024 रोजी रात्री आठच्या सुमारास परळी येथे महादेव गित्ते यांच्या घरासमोर सरपंच बापूराव आंधळे यांना बोलावून, आरोपींनी कट रचून पिस्तुलने गोळीबार केला होता. या घटनेत सरपंच आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला, तर फिर्यादी ज्ञानबा मारुती गित्ते हेही गोळीबारात जखमी झाले होते.

या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात कलम 302, 307, 120-ब, 326, 323 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यातील आरोपी 1) शशिकांत उर्फ बबन गित्ते हा फरार असून आरोपी 2) महादेव गित्ते, 3) मुकुंद गित्ते, 4) राजाभाऊ नेहरकर व 5) राजेश वाघमोडे यांना अटक करण्यात आली होती.

सदर आरोपींनी जामीनासाठी जिल्हा व सत्र न्यायालय, अंबाजोगाई येथे अर्ज दाखल केला होता. दरम्यान, सदर जामीन अर्ज प्रलंबित असताना सरकारतर्फे या गुन्ह्यात दोषारोपपत्र सादर करण्यात आले.

या प्रकरणात सरकारतर्फे विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. अशोक बालासाहेब कवडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी आरोपींच्या जामीन अर्जास विरोध दर्शवून साक्षी-पुराव्यांच्या आधारे प्रभावी युक्तिवाद मांडला.

अ‍ॅड. कवडे यांचा युक्तिवाद आणि दोषारोपपत्रातील प्रथमदर्शनी पुरावा ग्राह्य धरून न्यायाधीश श्रीमती तेहरा यांनी दिनांक 4 जुलै 2025 रोजी आरोपींचा जामीन अर्ज नामंजूर केला. या सुनावणीत अ‍ॅड. कवडे यांना अ‍ॅड. आर. आर. लोंढाळ यांनीही सहकार्य केले.