Breaking
Updated: डिसेंबर 27, 2025
लातूर-कल्याण राष्ट्रीय महामार्ग बीड जिल्ह्यातूनच करावा
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelखा.बजरंग सोनवणे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
बीड: लातूर-कल्याण (जनकल्याण द्रुतगती) प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गाचा मूळ मार्ग हा बीड जिल्ह्यातूनच जावा, अशी मागणी खा.बजरंग सोनवणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी २७ डिसेंबर रोजी मुख्यमंत्र्याना लेखी पत्र सादर केले आहे.
पत्रात खा.बजरंग सोनवणे यांनी म्हटले आहे, प्रस्तावित लातूर-कल्याण राष्ट्रीय महामार्ग हा बीड जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असून या महामार्गामुळे जिल्ह्याच्या औद्योगिक, शेतीपूरक व आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. तसेच या महामार्गाच्या माध्यमातून दळणवळण अधिक सुलभ होऊन व्यापार, उद्योग आणि रोजगारनिर्मितीसाठी मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. सध्या सदर महामार्गाचा मार्ग धाराशिव जिल्ह्याकडे वळविण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे निदर्शनास आणून देत, असे झाल्यास बीड जिल्ह्यावर अन्याय होईल आणि जनतेत तीव्र असंतोष निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शासनाने मूळ प्रस्ताव आणि नियोजनानुसारच लातूर-अंबाजोगाई-केज-बीड-जामखेड-अहिल्यानगर या मार्गानेच हा राष्ट्रीय महामार्ग विकसित करावा, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली आहे. बीड जिल्हा हा मागास भाग म्हणून ओळखला जात असून अशा महत्त्वाच्या पायाभूत सुविधेमुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग मोकळा होईल, असेही खा.सोनवणे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे शासनाने जनहिताचा विचार करून लातूर-कल्याण राष्ट्रीय महामार्गाचा मूळ मार्ग बीड जिल्ह्यातूनच अंतिम करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. लातूर-कल्याण राष्ट्रीय महामार्ग हा बीड जिल्ह्यातूनच प्रस्तावित आहे, असे असताना काही मंडळी यात खोडा आणू पहात आहेत. मुळ प्रस्तावित मार्ग बदलल्यास बीड जिल्ह्याच्या विकासाला ब्रेक लागेल. यामुळे सदरील मार्गात बदल नकोच, असेही म्हटले आहे.