कारच्या भीषण अपघात बीडमधील एकाच कुटुंबातील चौघे ठार
आष्टी : चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात बीडच्या एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यु झाला. हा अपघात आष्टीपासून जवळ असलेल्या धामणगांव घाटात बुधवारी सायंकाळी झाला.
बीडमधील प्रसिद्ध व्यापारी असलेल्या टेकवाणी कुटुंबातील पाच जण पुण्याहून बीडकडे येत होते. धामणगांव घाटात त्यांची क्रेटा गाडी रस्त्याच्या कडेला जावून आदळली. या अपघातात टेकवाणी कुटुंबातील सुनील टेकवाणी, शंकर टेकवाणी, सतीश टेकवाणी यांच्यासह आणखी एकाचा जागीच मृत्यु झाला. टेकवाणी कुटुंब बीडमधील एक प्रतिष्ठीत व्यापारी कुटुंब म्हणून ओळखले जाते. एकाच कुटुंबातील चौघांच्या झालेल्या अपघाती मृत्युमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच बीड येथील टेकवाणी यांच्या निवासस्थानी जावून अनेकांनी टेकवाणी कुटुंबाचे सांत्वन केले.
