गवत जाळण्यासाठी लावलेल्या आगीत चंदनासह मिलिया डुबियाची झाडे जळून लाखोंचे नुकसान
परळी : तालुक्यातील कन्हेरवाडी शिवारातील एका शेतकर्याच्या शेताजवळ असलेल्या कंपनीच्या भोवताली वाढलेले गवत व कचरा जाळण्यासाठी अनोळखी चौघांनी गवत पेटवले;मात्र ही आग वाढत गेल्याने शेतकर्याचे चंदन आणि मिलिया डुबिया जातीची झाडे जळाल्याने तब्बल 15 ते 20 लाखांचे नुकसान झाले. रविवारी (दि.4) दुपारी दिडच्या सुमारास हा प्रकार घडला.
शेषेराव अंतराम फड या शेतकर्याची कन्हेरवाडी येथे शेत जमिन आहे. या ठिकाणी त्यांनी काही चंदनाची झाडे तसेच काही क्षेत्रावर मिलिया डुबिया जातीची झाडे लावलेली होती. अनोळखी चौघांनी रविवारी दुपारी शेतालगतचे गवत पेटवून दिले,मात्र ही आग वाढत गेल्याने फड यांची चंदन आणि मिलिया डुबियाची झाडे जळून गेली. त्यामुळे लाखोंचे नुकसान झाले. शिवाय गवत जाळणार्या अनोळखी चौघांनी मुलाला गजाने मारहाण करत धमकावले असेही शेषेराव फड यांनी फिर्यादीत म्हटले आहे. यावरुन चौघांविरुध्द परळी ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद झाला.