बीड जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालक, शेतकी अधिकारी यांनी शेतकऱ्यांना ८५ कोटींना लुटले
भाई गंगाभीषण थावरे यांचा गंभीर आरोप
माजलगांव(प्रतिनिधी):-
बीड जिल्ह्यातील सहकारी व खाजगी साखर कारखाने व शेतकी अधिकारी यांनी हेक्टरी १० हजार प्रमाणे ८५ कोटीस शेतकऱ्यांना लुटले असल्याचा गंभीर आरोप शेतकरी संघर्ष समितीच्या अध्यक्ष भाई गंगाभीषण थावरे यांनी एका पत्रकाद्वारे केला आहे.
या पत्रकात पुढे म्हटले आहे कि, बीड जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी मिळून २०२०-२१ या गाळप हंगामात साखर आयुक्तलयाचा कार्यलयीन आकडेवारी नुसार ८५४८५.४० हेक्टर उसाची नोंद आहे .त्यानुसार उसास प्रत्येक हेक्टरी दहा हजार रुपये शेतकऱ्यास ऊस तोडणीसाठी खर्च झाला आहे. या विषयी प्रादेशिक सहसंचालक(साखर) औरंगाबाद यांच्या अध्यक्षतेखाली ०५/०१/२०२१ रोजी बैठक घेण्यात आली. या बैठकीस साखर संचालक औरंगाबाद योगीराज सुर्वे, शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष भाई गंगाभीषण थावरे, कार्यकारी संचालक जयभवानी, के.एल.क्षीरसागर, जमहेष शुगर्स इंडस्ट्रीचे गिरीश लोखंडे, लोकनेते सुंदरराव सोळंके कारखान्याचे घोरपडे, छत्रपती कारखान्याचे वाय.जी. अकरदे व वैद्यनाथ कारखान्याचे व्ही.एम.कुलकर्णी यांच्या उपस्थित बैठक झाली होती.
या बैठकीत कारखान्यांना खालील सूचना देण्यात आल्या होत्या-
१)यामध्ये प्रथम कार्यक्षेत्रातील ऊस कारखान्यांनी घ्यावा बाहेरचा ऊस आधीच आणू नये.
२)उसाला पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे भाव द्यावा.
३)को.२६५ जातीच्या उसाची नोंद घ्यावी, या मुद्द्यावर चर्चा झाली तसेच ऊस नोंदणीनुसार तोडणीसाठी ऑनलाईन स्लिप निघत नसेल तर ऑफलाईन स्लिप द्यावी, या बाबत पात्र सर्व ठेकेदारास द्यावे. कारखान्याकडून ऊस उतारा कमी दर्शवला जातो, या कामी समिती नेमण्यासाठी साखर आयुक्त पुणे यांना अहवाल सादर करावा.
ऊस उतारा किती,गाळप किती कोणत्या जातीचा ऊस गाळपासाठी घेतला जाणारा ऊस तोडणी मुकादमानी रकमेची मागणी केल्यास या बाबतची तक्रार करण्याची सूचना इ. बाबतची सूचना फलक कारखान्याच्या दर्शनी भागी लावावा, ऊस तोडणी साठी कोणीही रकमेची मागणी केल्यास देऊ नये व कारखान्यास तक्रार करावी याबाबत गाडी फिरवून प्रचार करावी.
या पुढे सर्व शेतकऱ्यांना ऊस नोंद घेतल्याची यादी ग्रामपंचायत कार्यालयावर लावावी.ऊसबिलाची रक्कम १४ दिवसाच्या आत एफ.आर.पी.रक्कम द्यावी.
परंतु आजपर्यंत कारखान्यांनी एकही सूचनांचे पालन केले नाही, यामुळे ऊसतोडणीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी १० हजार रुपये खर्च झाला याचा आकडा तब्बल ८५कोटी रुपये होतो. हे सर्व शेतकऱ्यांच्या खिशातून झालेली लूट कार्यकारी संचालक व शेतकी अधिकारी यांच्या संगनमताने झाली असून, यास सर्वस्वी जबाबदार तेच आहेत असा आरोप भाई गंगाभीषण थावरे यांनी केला आहे.
दरम्यान भाई गंगाभीषण थावरे यांनी शेतकऱ्यांसाठी आपला संघर्ष सुरु ठेवल्यामुळे शेतकऱ्यांचा ऊस गाळप होण्यापासून पैसे मिळण्यापर्यंत सर्व सुरळीत होत आहेत. यांच्या संघर्षामुळे साखर सम्राट, अधिकारी हे जागेवर असल्यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे.