Breaking
Updated: मार्च 7, 2026
येडेश्वरी साखर कारखान्याचा गाळप हंगाम १० मार्चला होणार बंद
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelउर्वरित उसाबाबत शेतकऱ्यांना तातडीने कारखान्याशी संपर्काचे आवाहन
केज : तालुक्यातील आनंदगाव सारणी येथील येडेश्वरी अॅग्रो प्रॉडक्ट्स लि.या साखर कारखान्याचा चालू गाळप हंगाम दि.१० मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता बंद करण्यात येणार असल्याची अधिकृत माहिती कारखाना प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस अद्याप गाळपासाठी बाकी आहे, त्यांनी तातडीने कारखान्याच्या शेती विभागाशी संपर्क साधून कार्यवाही करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व सदस्य तसेच बिगर सदस्य ऊस उत्पादकांनी चालू गाळप हंगाम २०२५-२६ साठी कारखान्याकडे उसाची नोंद केली होती. नोंद झालेल्या बहुतांश उसाचे गाळप पूर्ण झाले असून उर्वरित उसाबाबत शेतकऱ्यांनी तत्काळ कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
ज्या शेतकऱ्यांचा नोंद केलेला ऊस गाळपाअभावी शिल्लक राहिला असेल त्यांनी १० मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत कारखान्याकडे ऊस पाठविण्याची व्यवस्था करावी. तसेच नापिकी, रस्त्याची अडचण किंवा इतर कारणांमुळे ऊस तोड होऊ शकली नसेल, अशा शेतकऱ्यांनी स्वतः ऊस तोड व वाहतूक करून कारखान्याकडे पाठवावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, कारखाना बंद होण्यापूर्वी ऊस गाळपासाठी न पाठविल्यास शिल्लक राहिलेल्या उसाबाबत कारखाना प्रशासन जबाबदार राहणार नाही तसेच त्याबाबत कोणत्याही प्रकारची नुकसानभरपाई देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित सर्व ऊस उत्पादकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन कारखान्याच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.