Breaking
Updated: फेब्रुवारी 21, 2026
धनंजय देशमुख यांचा खळबळजनक दावा
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelधनंजय देशमुख यांचा खळबळजनक दावा
बीड – संतोष देशमुख हत्याकांडातील फरार आरोपी कृष्णा आंधळे हा आतापर्यंत 3 वेळा मस्साजोगला येऊन गेल्याची धक्कादायक बाब आज समोर आली. त्यामुळे पीडित देशमुख कुटुंबीयांनी त्याच्यापासून आपल्या जिवाला धोका असल्याचा दावा करत सुरक्षेची मागणी केली आहे.
संतोष देशमुख हत्याकांडाची आज बीडच्या सत्र न्यायालयात सुनावणी झाली. त्यात न्यायालायने सरकारी पक्षाला बचाव पक्षाला योग्य ते सर्व दस्तऐवजांची पूर्तता करण्याचे कडक निर्देश दिले. आजच्या सुनावणीत आरोपींचे वकील, पुराव्यांची कमतरता व सरकारी वकिलांच्या नियुक्तीवर जोरदार खडाजंगी झाली. आरोपी क्रमांक 3 ते 7 यांनी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना या प्रकरणातून वगळण्याची मागणी केली. त्यांनी तसा अर्ज कोर्टात सादर केला. कोर्टाने सरकारी पक्षाला या अर्जावर आपले लेखी म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले.
आरोपी जयराम चाटे याने आपला वकील बदलला आहे. आता त्याच्यातर्फे वकील एम के वाघीरकर हे युक्तिवाद करणार आहेत. आरोपी प्रतीक घुले यानेही वकील लावण्यासाठी कोर्टाकडे 10 ते 15 दिवसांचा वेळ मागितला आहे. कोर्टाने त्यांना हा वेळ दिला. त्यानुसार आता 6 मार्च रोजी या प्रकरणाची पुढील सुनावणी होईल
कृष्णा आंधळे मस्साजोगला आला?
दुसरीकडे, आजच्या सुनावणीनंतर पत्रकारांशी बोलताना संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याच्याविषयी एक नवा दावा केला. ते म्हणाले की, प्रस्तुत प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे मागील 6 महिन्यांत 3 वेळा आमच्या गावी येऊन गेला. यामुळे आमच्या कुटुंबाच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. आम्ही ही गोष्ट या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीआयडीच्या कानावर घातली आहे. त्यांनीही हा फरार आरोपी गावात येऊन गेल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे त्याला लवकरात लवकर अटक करून त्याची संपूर्ण बीड जिल्ह्यात धिंड काढण्यात यावी.
आतापर्यंत कोणकोणत्या आरोपींना अटक?
सदर प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 7 जणांना अटक केली आहे. यापैकी काहींवर हत्या व काहींवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेत करण्यात आलेल्यांत जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे व माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा राईट हँड मानल्या जाणाऱ्या वाल्मीक कराडचा समावेश आहे. यापैकी विष्णू चाटे व सुदर्शन घुले यांच्यावर हत्या व खंडणीचाही गुन्हा दाखल आहे. तर वाल्मीक कराड याच्यावर खंडणी प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणातील कृष्णा आंधळे हा आरोपी अद्याप फरार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक नेमले आहे. पण अद्याप त्याचा शोध लावण्यात पोलिसांना अपयश आले आहे.