उन्हाच्या तडाख्याने नागरिकांची होरपळ
अंबाजोगाई (प्रतिनिधी)- शहर व जिल्ह्यात सूर्यनारायणाचे आग ओकणे सुरूच असून मंगळवारी उन्हाच्या तडाख्याने नागरिकांची अक्षरशः होरपळ झाली. तापमानाचा पारा तब्बल 39 अंश सेल्सिअसवर पोहोचला. यंदाच्या हंगामातील सर्वोच्च तापमानाची नोंद हवामान खात्याकडे झाली आहे.
मंगळवारी तापमान 39 अंश सेल्सिअसवर आहे. गेल्या काही दिवसांपासून अंबाजोगाईतील तापमान 39 अंशांच्या आसपास आहे. सूर्यनारायणाने अक्षरशः आग ओकण्यास सुरुवात केल्याने अंबाजोगाईकरांची सोमवारी होरपळ झाली. सकाळपासूनच कडक ऊन जाणवत होते. उन्हाचा पारा वाढल्याने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही झाली. त्यामुळे अनेकांनी घराबाहेर जाणे टाळले. वाढत्या तापमानामुळे बाजारपेठा व गजबजलेले रस्ते अक्षरशः ओस पडले होते. कडक उन्हामुळे शहरात दुपारच्यावेळी कोणीही घराच्या बाहेर दिसून येत नाही. पंखा, कूलरची हवादेखील गरम लागत आहे. कडक ऊन पडत असल्याने बहुतांश नागरिक सकाळच्या सत्रातच महत्त्वाची कामे उरकण्यास प्राधान्य देत आहेत. उन्हाची दाहकता कमी करण्यासाठी थंड पेयांना मागणी वाढली आहे. त्यामुळे ज्यूस, आईस्क्रीमच्या दुकानात ग्राहकांची गर्दी वाढल्याचे दिसून आले. तसेच उन्हापासून बचावासाठी छत्र्या, टोप्या, गमजे, स्कार्फ आदींचा वापर वाढला आहे.