पुलाअभावी मुलीचा मृतदेह खांद्यावर घेऊन वडिलांनी पार केली नदी
गेवराई : नदीवरील पूल वाहून गेल्याने वडिलांना आत्महत्या केलेल्या स्वतःच्या मुलीच्या मृतदेह खांद्यावरून घेऊन जाण्याची दुर्दैवी वेळ आली. संताप आणणारी ही घटना गेवराई तालुक्यातील भोजगाव येथील आहे.
गेवराई तालुक्यातील भोजगावमधील महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या निकीता दिनकर संत (वय १८) या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. भोजगाव परिसरातून वाहणाऱ्या अमृता नदीवरील पूल मागील महिन्यात वाहून गेला आहे. निकिताचा मृतदेह उमापूर येथील रुग्णालयात नेण्यासाठी नदी पर्यंत बैलगाडीतून नेण्यात आला. मात्र पुढे बैलगाडी देखील जात नसल्याने, चक्क नदी ओलांडण्यासाठी वडिलांना आपल्या मुलीचा मृतदेह खांद्यावर घेऊन जावे लागले.
गेल्या अनेक महिन्यांपासून पूल दुरुस्तीची मागणी करूनही पूल दुरुस्त केला नसल्याने ग्रामस्थांतून लोकप्रतिनिधींसह प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान गेवराईच्या चोरपूरी येथील रस्त्याने महिलेचा बळी घेतल्याची घटना ताजी असतानाच या भोजगावच्या दुर्दैवी आणि संतापजनक घटनेनंतर तरी स्थानिक लोकप्रतिनिधींसह प्रशासनाला जाग येणार का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. काही दिवसांपूर्वी खराब रस्त्यामुळे एका महिलेला आपला जीव गमवावा लागला होता. ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा एक दुर्दैवी आणि संतापजनक घटना गेवराईच्या भोजगावमध्ये समोर आली आहे.