धारुर तालुक्यात कोवैक्झिन लसीच्या दुसऱ्या डोसपासून शेकडो लोक वंचित;
किल्लेधारूर - संपूर्ण महाराष्ट्रात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. वाढती कोरोनाची रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असतानाच लसीकरण मोहीमही मोठ्या प्रमाणात राज्यभरात सुरू आहे. बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून लसीकरण केंद्र कधी सुरू तर कधी बंद असं चित्र पाहायला मिळत आहे. धारुर तालुक्यात ४५ वर्षांपुढील लोकांसाठी कोवैक्झिन लसीचा पुरवठा होत नसल्याने शेकडो लोक दुसऱ्या डोसपासून वंचित असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
सध्या जिल्ह्यात राज्य सरकारकडून १८ ते ४४ वयोगटासाठी कोवैक्झिन लसीचा पुरवठा झालेला आहे. यामुळे अॉनलाईन नोंदणी केलेल्या १८ ते ४४ वयोगटातील लोकांची लसीकरण मोहिम सुरु आहे. केंद्राकडून ४५ वर्षावरील लोकांना लसीकरण देण्यात येत आहे. यासाठी केंद्राने कोविशिल्ड लस उपलब्ध केली आहे. जिल्हाभरात लसीकरणावर जोर देण्याचा प्रयत्न प्रशासन करत असताना लसीच्या दुसऱ्या डोसचे नियोजन ढासळल्याचे दिसत आहे. धारुर तालुक्यात कोवैक्झिन लसीचे दुसऱ्या डोसपासून अनेक जण वंचित आहेत.
ज्या नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस यापूर्वीच घेतलाय आणि त्यांना दुसरा डोस आता घ्यायचा आहे. अशा व्यक्तींना प्राधान्य देणे गरजेचे असताना लसीच्या दुसरा डोस घेण्याची मर्यादित दिवस संपत असताना लोक वंचित असल्याचे दिसत आहे. लसीकरण केंद्रावर गेल्या अनेक दिवसांपासून ४५ वर्षाच्या पुढील लोकांची गर्दी दुसऱ्या डोससाठी होत आहे. मात्र कोवैक्झिन लस उपलब्ध नसल्याने लोकांना परतावे लागत आहे.
ऐकट्या धारुर तालुक्यात जवळजवळ २५० ते ३०० लोक कोवैक्झिनच्या दुसऱ्या डोसपासून वंचित आहेत. केंद्र सरकारकडून ४५ वर्षाच्या पुढील नागरिकांसाठी कोरोना लसीचा पुरवठा होतो. सध्या केंद्राकडून कोविशिल्ड या लसीचा पुरवठा सुरु आहे. कोविशिल्ड लसीचे दोन्ही डोस देणे सुरु आहेत अशी माहिती डॉ. चेतन आदमाने यांनी दिली. मात्र कोवैक्झिन लस उपलब्ध नसल्याने कौवैक्झिनचा दुसरा डोस बंद आहे वरिष्ठस्तरावर मागणी करण्यात आलेली असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रत्यक्षात मात्र धारुर तालुक्यात कोवैक्झिन लसीच्या दुसऱ्या डोसपासून अनेक जन वंचित असल्याचे समोर येत आहे. यातच पुन्हा उद्यापासून जिल्ह्यात लसीकरणाला वेग देण्यात येत आहे. दरम्यान, लसीकरण केंद्रावर विनाकारण गर्दी करू नये, असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. तसेच नोंदणी केली नसल्यास कोणालाही लस मिळणार नाही. हे देखील स्पष्ट करण्यात आलं आहे. यामुळे आता लसीकरण मोहीम आणखी वेगाने पुढे नेवून कोरोना विरुध्द लोकांना सक्षम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसत आहे.