Breaking
Updated: मे 22, 2026
अंबाजोगाई नगर परिषदेकडून मान्सून पूर्व स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर; जयवंती नदीसह १४ नाल्यांची सफाई
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई (प्रतिनिधी) : पावसाळा तोंडावर आल्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे, यासाठी अंबाजोगाई नगर परिषदेच्या वतीने मान्सून पूर्व स्वच्छता मोहीम अत्यंत वेगाने राबविण्यात येत आहे. अंबाजोगाईचे नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा आणि मुख्याधिकारी यांच्या आदेशानुसार ही मोहीम आधीच सुरू करण्यात आली असून, सध्या ती अंतिम टप्प्यात आली आहे.
या विशेष मोहिमेअंतर्गत शहरातील मुख्य जयवंती नदीसह लहान-मोठ्या एकूण १४ नाल्यांची सखोल स्वच्छता करण्यात येत आहे. पावसाळ्यात नाल्यांमध्ये कचरा आणि गाळ साचून पाण्याचा निचरा होण्यास अडथळा येऊ नये, यासाठी ही खबरदारी घेतली जात आहे. नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाचे कर्मचारी आणि आधुनिक यंत्रसामग्रीच्या (जेसीबी) साहाय्याने हा गाळ उपसला जात असून, नाल्यातून काढलेली सर्व घाण थेट डम्पिंग ग्राऊंडवर नेऊन टाकली जात आहे.
अंबाजोगाई नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाचे स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे यांनी शहरातील नागरिकांना जाहीर आवाहन केले आहे. ते म्हणाले की:
“शहरात ज्या नागरिकांचे रिकामे प्लॉट (भूखंड) आहेत, त्यांनी देखील आपल्या जागेची वेळेत स्वच्छता करून घ्यावी. पावसाळ्यात अशा रिकाम्या जागांवर कचरा आणि पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणावर डासांची पैदास होते, ज्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका असतो. नागरिकांनी स्वच्छता राखून आपल्या शेजाऱ्यांना त्रास होणार नाही आणि शहराचे आरोग्य धोक्यात येणार नाही, याची काळजी घ्यावी.”