Breaking
Updated: एप्रिल 13, 2026
शेततलावात बुडून १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू; आष्टी तालुक्यातील दुर्घटना
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelआष्टी: तालुक्यातील शेरी बुद्रुक येथे सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास एका १८ वर्षीय तरुणाचा शेततलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रितेश दीपक वाघमारे असे या मृत तरुणाचे नाव असून, मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेला असताना पाय घसरून खोल पाण्यात गेल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून वाघमारे कुटुंबाचा तरुण आधार हरपल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रितेश हा सोमवारी दुपारी आपल्या काही मित्रांसोबत गावातीलच एका शेतकऱ्याच्या शेततलावावर पोहण्यासाठी गेला होता. काही वेळानंतर त्याचे इतर मित्र पोहून तिथून निघून गेले, मात्र रितेश आणि त्याचा एक सहकारी मित्र तिथेच थांबले होते. यावेळी काठावर बसून कपडे धुवत असताना अचानक रितेशचा पाय घसरला आणि तो थेट शेततलावाच्या खोल पाण्यात गेला. रितेशला पोहता येत नसल्याने तो स्वतःचा जीव वाचवू शकला नाही आणि काही वेळातच पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने शेततलावाकडे धाव घेतली. तातडीने प्रयत्न करून रितेशचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. त्यानंतर त्याला तातडीने शवविच्छेदनासाठी कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. अवघ्या १८ वर्षांच्या रितेशच्या अकाली निधनाने वाघमारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, आजोबा आणि एक भाऊ असा परिवार आहे. एक उमदा तरुण अशा प्रकारे अपघाती मृत्यूला बळी पडल्याने परिसरात तीव्र दुःख व्यक्त होत आहे.